भाजपची ती अपेक्षा नारायण राणे पूर्ण करतील काय? 

ही ताकद वाढवण्यासाठी भाजपकडून खासदार नारायण राणे यांना रत्नागिरीच्या रणात उतरविण्यात आले आहे.
Will Narayan Rane fulfill that expectation of BJP?
Will Narayan Rane fulfill that expectation of BJP?

रत्नागिरी : कोकणच्या विकासासाठी भविष्यात येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपला एकवेळ संधी द्या, असे आवाहन करतानाच शिवसेनेवर आसूड ओढत भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी स्थानिक नेते, कार्यकर्ते यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण केली आहे.

बालेकिल्ल्यात शिवसेनेशी दोन हात करण्यासाठी राणेंसारख्या तगड्या नेतृत्त्वाचा निश्‍चित भाजपला उपयोग होणार असून सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत भविष्यात भाजप मोठी भरारी घेईल, असा विश्‍वास राणे यांनी व्यक्त केला. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंचा जम बसलेला आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात सगळीकडेच सावळा गोंधळ आहे. कोकणात तगडे नेतृत्व निर्माण करण्याची भाजपला मोठी गरज आहे. ती संधी नारायण राणेंच्या रूपाने मिळाली आहे. ती भूमिका राणे मोठ्या हिमतीने निभावून नेऊ शकतील.

रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीने पाय पसरलेले आहेत. भाजपचा टक्‍का विखुरल्याप्रमाणे आहे. ही ताकद वाढवण्यासाठी भाजपकडून खासदार नारायण राणे यांना रत्नागिरीच्या रणात उतरविण्यात आले आहे. सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेतून राणेंनी त्याचे सूतोवाच केले. कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. 

दरम्यान, खासदार राणे यांनी उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी जिल्ह्यात लक्ष घालून नाराज ज्येष्ठ शिवसैनिकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे सामंत यांच्याबरोबरच शिवसेनेला राणे यांचे डाव प्रतिडाव ओळखून वाटचाल करावी लागणार आहे. 

या पूर्वी माजी खासदार नीलेश राणे यांनी सातत्याने रत्नागिरीचे दौरे करत भाजप कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड हे या मतदार संघाचे दौरे करत आहेत. पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी शिवसेनेच्या ज्येष्ठ दुर्लक्षित नेत्यांच्या गाठीभेटीही घेत वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता. दोन महिन्यांनी जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यात कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचे काम या दौऱ्याने साध्य होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. 

भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून रत्नागिरी नगरपालिकेतील जागेच्या प्रश्‍नाव्यतिरिक्‍त शिवसेनेला कचाट्यात अडकवण्यासाठी एखाद्या स्थानिक जिव्हाळ्याचा विषय लावून धरल्याचे उदाहरण विरळच आहे. त्यामुळे राणेंची रत्नागिरी भेट भाजपच्या पदाधिकाऱ्यांसाठी सकारात्मक ठरणार आहे. 

आक्रमक पवित्रा घेण्याची सूचना 

पक्ष वाढविण्यासाठी आक्रमक पवित्रा घेण्याच्या सूचनाही नारायण राणे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जे कोणी पक्षात येऊ शकतात, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करा, असे सांगितले. त्यासाठी स्वतः बोलण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नाराजांना समाविष्ट करण्याच्या भाजपच्या मोहिमेला बळ मिळणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com