पुणे : "परीक्षा रद्द झाल्याने कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत द्यावी,' अशी मागणी सौरभ राजू शेट्टी यांनी केली आहे. शिवाजी विद्यापीठाने परीक्षा फी परत द्यावी, यासाठी राजू शेट्टी यांचे सुपुत्र मैदानात उतरले आहेत. या विषयावरून मंगळवारी (ता. 7 जुलै) त्यांची विद्यापीठात परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांशी खडाजंगी झाली.
सौरभ शेट्टी यांनी मंगळवारी शिवाजी विद्यापीठात जाऊन परीक्षा विभाग प्रमुखांची भेट घेतली. या वेळी त्यांनी "विद्यार्थ्यांची घेतलेली फी परत द्यावी,' अशी मागणी करणारे निवेदन दिले. या वेळी संबंधित अधिकाऱ्यांनी शेट्टी यांना "आम्ही प्रश्नपत्रिका छापल्या आहेत,' असे उत्तर दिले. त्यावर सौरभ शेट्टी म्हणाले,"परीक्षा फी परत दिली नाही, तर आम्ही आंदोलन करणार आहोत. त्यामुळे लवकरात लवकर फी परत द्या.'
परीक्षा विभागाला दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, "कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महाविद्यालयीन परीक्षा रद्द केल्या आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत तीन जिल्ह्यांतील एकूण 279 विद्यालये आहेत. या विद्यालयाकडून अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी परीक्षा फी घेतलेली आहे, या सर्व विद्यालयांत वेगवेगळ्या विभागातील जवळपास अडीच लाख विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची सरासरी 13 कोटी रुपये परीक्षा फी शिवाजी विद्यापीठाकडे जमा झालेली आहे.
हे सर्व विद्यार्थी शेतकरी, शेतमजूर, कामगार तसेच गरीब सर्वसामान्य वर्गातील जनतेची मुले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या सर्वत्र मंदीची लाट सुरू आहे. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. कामगार वर्ग आर्थिक अडचणीत संकटात सापडला आहे.
शेतीमालाला भाव नाही, त्यातच राज्य सरकारकडून महाविद्यालयाच्या अंतिम परिक्षा रद्द केल्या आहेत. परीक्षाच रद्द केल्याने या परीक्षेची आपल्याकडून घेतलेली फी संबंधीत विद्यार्थ्यांना परत मिळावी, जेणेकरून पालकांना व विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल,' असे या निवेदनात म्हटले आहे.
मुंबई : राज्यात कोव्हिड-19 प्रादुर्भावाचा जोर वाढला असून, सोमवारी (ता. 6 जुलै) दिवसभरात 5368 रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दोन लाख 11 हजार 987 झाली आहे. आणखी 204 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा आकडा 9026 वर पोचला आहे. राज्यात एकूण 86,040 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सोमवारी राज्यात एकूण 204 कोरोनाबळींची नोंद झाली. त्यापैकी मुंबईत 39, ठाणे जिल्ह्यात 75, पुणे मंडळात 28, औरंगाबाद मंडळात 12, नाशिक मंडळात 39, कोल्हापूर मंडळात दोन, लातूर मंडळात चार, अकोला मंडळात चार, नागपूर मंडळात एका रुग्णाचा मृत्यू झाला.
सध्या राज्यातील मृत्यूदर 4.26 टक्के आहे. आतापर्यंत 11 लाख 35 हजार 447 रुग्णांच्या नमुन्यांपैकी दोन लाख 11 हजार 987 म्हणजे 18.67 टक्के चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात सहा लाख 15 हजार 265 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आणि 46 हजार 355 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.