Ganpatrao Deshmukh .jpg
Ganpatrao Deshmukh .jpg

सांगोल्यात शेकाप पक्ष एकसंघ ठेवण्यासाठी नेतृत्वाचा लागणार कस

तालुक्याच्या राजकारणामध्ये विशेषत: शेकापमध्ये गणपतरावांचा शब्द हा अंतिम मानला जात होता.

सांगोला (जि. सोलापूर) : सांगोला (Sangola) हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. माजी आमदार भाई गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांच्या निधनाने सांगोला तालुक्याच्या पक्षीय राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शेकापमध्ये आबासाहेबांचा शब्द अंतिम मानला जात होता. परंतु गणपतराव आबांच्या निधनाने तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना एकसंघ ठेवण्यासाठी यापुढे नेतृत्वाचा कस लागणार आहे. सद्यस्थितीत शेकाप एकसंघ ठेवण्यासाठी पक्षातील सामूहिक नेतृत्वाने प्रयत्न केले पाहिजेत. (It will take leadership to keep the PWP united in Sangola) 

शेकाप म्हटले की सांगोला हे समीकरण दृढ झाले होते. माजी आमदार कै. गणपतराव देशमुख 1962 सालापासून सांगोला मतदारसंघात अकरा वेळा निवडून आले होते. 1972 मध्ये काँग्रेसचे काकासाहेब साळुंखे-पाटील व 1995 मध्ये आमदार शहाजी पाटील यांच्याकडून फक्त दोन वेळा त्यांचा पराभव झाला होता. तालुक्याच्या राजकारणामध्ये विशेषत: शेकापमध्ये गणपतरावांचा शब्द हा अंतिम मानला जात होता. ग्रामपंचायतच्या निवडणुकीपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद असो किंवा विधानसभेची निवडणूक असो आबासाहेब सर्वांशी चर्चा करून जनतेला हवा तोच निर्णय ते घेत होते. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत सामान्य मतदार त्यांना 'आपण आदेश द्या, आम्ही त्याचे पालन करू' असे आग्रहाने बोलत होते. 

त्यामुळे आजपर्यंतच्या कोणत्याही निवडणुकीत कार्यकर्त्यांचा रुसवे-फुगवे, नाराजीचा सुर जास्त होत नव्हता. झाला तरी आबासाहेब त्यावर सर्वांशी चर्चा करुन निश्चितपणे तोडगा काढीत होते. त्यामुळे तालुक्यात शेकाप म्हणजेच गणपतराव देशमुख असे एक समीकरण झाले होते. परंतु गणपतराव आबांच्या निधनामुळे तालुक्यात सर्व कार्यकर्त्यांना सामावून, त्यांच्याशी विचारविनिमय करून आणि हवा तो योग्य निर्णय घेण्यासाठी, शेकापची ताकद आहे तशीच ठेवून ती वाढवण्याचा प्रयत्न करण्यासाठी, येणाऱ्या निवडणुकीमध्ये शेकापचे प्राबल्य दाखवण्यासाठी आता पक्षाच्या नेतृत्वाची मोठी कस लागणार आहे. 

शेकापमध्ये त्यासाठी या अगोदरपासून आबासाहेबांबरोबर असणारे त्यांचे पुत्र चंद्रकांत देशमुख, विधानसभा निवडणूक लढवलेले डॉ. अनिकेत देशमुख व नुकतेच कार्यकर्त्यांचा व कोरोनाच्या महामारीच्या काळात गावपातळीवरील सामान्य कार्यकर्त्यांशी सतत संपर्क ठेवणारे दुसरे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासह तालुक्यातील असणारे इतर नेतृत्वाने सामूहिकरित्या प्रयत्न करण्याची गरज आहे. सामुहिक नेतृत्वानेच शेकाप पक्ष शहरापासून ग्रामीण भागापासून पर्यंत एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी अपेक्षा सामान्यांमधून व्यक्त होत आहे.

असे बोलु नका, खाली बसा :

तालुक्यात कोणतेही आंदोलन किंवा राजकीय सभा असो आबासाहेब समोर असताना कोणत्याही कार्यकर्त्यांनी नेत्यांनी इतर पक्षावर पक्षाच्या नेतृत्वावर खालच्या पातळीत बोलायला सुरुवात केल्यास आबासाहेब त्वरित हातात माईक घेऊन 'असे बोलू नका, खाली बसा' असे सुनावले की कोणीही विरोधकांवर टीका करतानाही आबासाहेबांसमोर विचार करुन बोलत असे.

...तर माझे आयुष्य फुकट गेले :

यावेळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी निवडणुकीत उभा राहणार नसलो तरी राजकारण सोडले असे नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मी सामान्यांची सेवा करीन. परंतु माझ्यानंतर शेकाप पक्ष तालुक्यात राहणार नसेल तर माझे आयुष्य फुकट गेले असे ते एका सभेत आवर्जून बोलले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com