अकोला : कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढत असताना नागरिकांना संकट काळात मदतीचा हात देण्याऐवजी अकोला जिल्हा पोलिस प्रशासनाकडून दुचाकी वाहनधारकांना नाहक त्रास देण्याचे प्रकार सुरू आहे. सरकारी आदेशाच्या नावाखाली रुग्ण, महिला, शेतकरी यांची वाहने जप्त केली जात आहे.
सरकारने त्यांच्याबाबत सहानभूतिपूर्वक विचार करण्याचे आदेश दिले असतानाही अकोला वाहतूक पोलिसांनी मनमानी सुरू केली आहे, असा आरोप करीत त्याविरोधात भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि आमदार गोवर्धन शर्मा यांनी मंगळवारी (ता. 16) जिल्हाधिकारी कार्यालयापुढे पदाधिकाऱ्यांसोबत निदर्शने करून कारवाई थांबविण्याची मागणी केली.
शहरामध्ये एकीकडे कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत उद्योगधंदे बंद असल्याने कामगार बेरोजगार झाले आहेत. प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी, लॉकडाउन यासारखी उपाय योजना सरकारने केली आहे. नागरिकांनीसुद्धा सरकारला सहकार्य केले. आता दैनंदिन व्यवहार सुरू करीत शेतकरी, शेतमजूर, लघु उद्योजक यांना दिलासा देण्यासाठी सरकारने एक जून 2020 पासून व्यवहार सुरळीत करण्यास सुरुवात केली आहे. रुग्णांना औषधोपचार मिळावा, शेतकरी व महिलांना त्रास होऊ नये, या साठी सरकारने आदेश दिले आहेत.
हेही वाचा : मोदी, ठाकरे यांची निर्णयक्षमता संपली : आंबेडकर
असे असतानाही जिल्हा पोलिस प्रशासनाच्या आदेशाच्या नावावर वाहतूक पोलिसांकडून नागरिकांना वेठीस धरण्याचे प्रयत्न होत आहेत. सर्रासपणे दुचाकी वाहन जप्त करून न्यायालयाच्या फेऱ्या घालण्यास नागरिकांना बाध्य केले जात आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशाकडेही पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या संकटाच्या काळात गरजूंनाच आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे, असा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर व शहराध्यक्ष विजय अग्रवाल, आमदार गोवर्धन शर्मा यांनी केला आहे.
कोरोना प्रादुर्भाव काळात नागरिक संकटात असताना गरजूंना त्रास देण्याचे प्रकार नागरिकांकडून होत आहे. वाहतूक पोलिस नागरिकांना समजून न घेता कारवाई करीत असल्याबद्दल भाजपच्या वतीने मंगळवारी (ता. 16) जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निर्दशने करण्यात आली. जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, शहराध्यक्ष विजय अग्रवाल, आमदार गोवर्धन शर्मा यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने करण्यात आली. याबाबतचे निवदेन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
या आंदोलनात महापौर अर्चना मसने, तेजराव थोरात, सचिन देशमुख, मनोहरराव राहणे, चंदाताई शर्मा, डॉ. विनोद बोर्डे, माधव मानकर, संजय गोडा, संजय जिरापुरे, अक्षय गंगाखेडकर आदींसह पदाधिकारी सहभागी झाले होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.