कोल्हापूर : "आमचे सरकार सूडभावनेने काम करणारे नाही. "कॅग'चा रिपोर्ट आल्यामुळेच जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा विषय पुढे आला आहे. आमच्या सरकारने सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांच्याही साखर कारखान्यांना 500 कोटी रुपयांची थकहमी दिली. यामागे शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप व्हावे, एवढीच आमची भावना आहे. भाजपचे सरकार राज्यात सत्तेवर असते, तर अशा थकहमीमध्ये आमचे कारखाने आले असते का?' असा सवाल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.
भाजप सरकारच्या काळात दहा हजार कोटींचा निधी खर्च करूनही जलयुक्त शिवार योजनेची उद्दिष्ट्ये साध्ये होऊ शकली नाहीत, असे ताशेरे "कॅग'च्या अहवालात ओढण्यात आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने या योजनेवर झालेल्या दहा हजार कोटींच्या निधीच्या खर्चाची चौकशी लावली आहे. त्यासाठी एसआयटीची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावरून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ठाकरे सरकार याबाबत राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. त्याला मुश्रीफ यांनी कोल्हापुरात आज (ता. 16 ऑक्टोबर) उत्तर दिले.
मुश्रीफ म्हणाले की, जलयुक्त शिवार योजनेमुळे गावागावातील पाण्याची पातळी वाढणे अपेक्षित होते; शिवारात पाण्याची पातळी तर वाढलीच नाही. मात्र, प्रकल्पात भ्रष्टाचार झाला आहे. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार या अभियानाची खुली चौकशी होणार आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील जलशिवार योजनेमध्ये लोकसहभाग होता; म्हणून सांगत आहेत. ती गोष्ट वेगळी आहे. पण यात सरकारच्या दहा हजार कोटीच्या निधीवर डल्ला मारल्याचा ठपका "कॅग'ने ठेवला आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळाने या अभियानाची खुली चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप सरकारने एकेका प्रकल्पाची सुधारित प्रशासकीय मान्यता ही मूळ किमतीच्या 900 टक्के, 700 टक्के, 600टक्के, 500 टक्के एवढी वाढवून दाखवली आहे. या सगळ्या प्रकल्पांमधील गैरव्यवहाराची चौकशी झाली पाहिजे.
भाजप सरकारच्या पाच वर्षांच्या काळातील "हायब्रीड ऍन्युईटी' योजनेंतर्गत झालेल्या रस्ते प्रकल्पांचीही चौकशी झालीच पाहिजे. या योजनेअंतर्गत घेतलेली कामे आजघडीला बंद आहेत. रस्त्यांचे कंत्राटदार गायब झालेत. पाटील यांनी किमान आपल्या जिल्ह्यातील रस्ते तरी चांगले करण्याची जबाबदारी घ्यायला हवी होती. त्यामध्ये सुद्धा ते अपयशी ठरले. गारगोटी-कोल्हापूर हा रस्ता दोन-तीन वर्षांतच खराब झाला. निपाणी-राधानगरी रोडचे काम बंद आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Edited By vijay Dudhale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.