सावंतवाडी : "मंत्रिपद मिळाले नाही; म्हणून मी नाराज नाही, तर चांदा ते बांदा योजना बंद करून निधी परत घेतला; म्हणून माझी नाराजी आहे. या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला "खो' बसला आहे. जनतेसाठी आपण हा निधी आणला होता,' असा दावा करून आमदार दीपक केसरकर यांनी त्यांच्या नाराजीबाबत उठत असलेल्या वावड्यांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
माजी अर्थराज्य मंत्री असलेले केसरकर हे सावंतवाडीतील पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने दीपक केसरकर हे नाराज असल्याची चर्चा होती. त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले.
केसरकर म्हणाले की, मी मंत्री असताना कोकण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोट्यवधींचा निधी दिला होता; परंतु काही प्रमाणात तो परत गेला. त्याबद्दल माझी नाराजी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 200 ते 250 कोटी रुपये परत गेले, त्यामुळे जिल्ह्याचा विकास रखडला. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आपण सात ते आठ वेळा चर्चा केली आहे. चांदा ते बांदा योजनेचा निधीदेखील परत गेला. रस्त्याचा निधी परत गेला. सिंधुदुर्गनगरीमधील निधी परत गेला. मी पालकमंत्री किंवा मंत्री नसलो तरीसुद्धा गेल्या सात महिन्यांत सरकारकडे या निधीसाठी पाठपुरावा करत आहे.
शासकीय मेडिकल कॉलेज सिंधुदुर्गात व्हावे; म्हणूनदेखील माझा आग्रह राहिला. मुख्यमंत्र्यांचे आदेश निघताच शासकीय मेडिकल कॉलेजची पुढील कार्यवाही सुरू झाली आहे, असे केसरकर म्हणाले.
मी राज्याचा पाच वर्ष अर्थराज्यमंत्री होतो, त्यामुळे या विभागात मंजूर केलेल्या निधीबाबत मला अभ्यास असल्याने मी हा पाठपुरावा करत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जबाबदारी घेऊन मी काम करणार आहे. मला मिळालेले विशेषाधिकार समितीचे प्रमुख म्हणून घटनेप्रमाणे काम करणार आहे. मंत्रिपदासाठी लटकून राहणारा मी नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत. ते जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य आहे. मी शिवसेनेचा आहे आणि शिवसेना सोडणार नाही. उठणाऱ्या अफवांकडे मी लक्ष देत नाही. कोकणात एक हजार कोटी रुपयांचा बॅकलॉग आहे. पर्यटनाचाही विकास झालेला नाही, असे ते म्हणाले.
बांदा ते आरोंदा तेरेखोल खाडी गाळ काढून ती खोल करण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी जलपर्यटन केले जाईल, या ठिकाणी मिळालेली वाळू मेरीटाइम बोर्डाने योग्य भावात लिलावात घालावी, यासाठी आपला प्रयत्न आहे. शिरशिंगे नैसर्गिकदृष्ट्या सौंदर्यवान आहे. दक्षिणेतील काश्मीरची ओळख शिर्शिंगेकडे पाहिल्यानंतर होते, तसे पर्यटनस्थळ ते बनवायचे होते. तेथील धरणाचे काम देखील जलद होईल, असे ते म्हणाले. तसेच संकेश्वर बांदा रस्ता चर्चेत आहे. मी कोल्हापूर पाडगाव शिरर्शिंगे कलंबिस्त सावंतवाडी बांदा असा रस्ता सुचवला होता.
स्टॉलधारकांचे पुनर्वसन केले आहे, पुन्हा स्टॉल उभे राहिले तर शहराचे सौंदर्य बिघडेल आणि त्यांचे पुनर्वसन कुठे करणार? असा प्रश्न आहे, असे त्यांनी सांगितले.
Edited By Vijay Dudhale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.