...म्हणून भारतनानांच्या वेशभूषेत उमेदवारी अर्ज दाखल केला : भगिरथ भालके 

भारतनानांच्या समाधीचे दर्शन घेऊन भगिरथ यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला.
... So I filed my candidature in Bharatanana costume: Bhagirath Bhalke
... So I filed my candidature in Bharatanana costume: Bhagirath Bhalke

मंगळवेढा (जि. सोलापूर) : आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर गेल्या तीन महिन्यांपासून मतदारसंघात फिरत असताना जनतेने आधार दिला, तसेच भरभरून प्रेम दिले. त्यांनीच मला ज्या दिवशी तुम्ही अर्ज भरणार आहात, त्या दिवशी आम्हाला भारतनानांच्या वेशभूषेत तुम्हाला बघावयाचे आहे, अशी विनंती केली होती. त्या विनंतीला मान देऊनच मी आज नानांच्या वेशभूषेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलो आहे, असे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भगिरथ भालके यांनी सांगितले. 

पंढरपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून भगिरथ भालके यांना सोमवारी (ता. 29 मार्च) अधिकृत उमेदवारी जाहीर झाली. अर्ज दाखल करताना भगिरथ भालके यांनी मंगळवारी (ता. 30 मार्च) (स्व.) आमदार भारत भालके यांच्या पेहरावाप्रमाणेच पांढरा शर्ट, विजार आणि डोक्‍यावर पांढरी टोपी असा पेहराव परिधान केला होता. भारतनानांच्या समाधीचे दर्शन घेऊन भगिरथ यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. भगिरथ यांच्या पेहरावाची चर्चा रंगली होती. त्यानंतर बोलताना त्यांनी या पेहरावामागील रहस्य सांगितले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी ट्‌विटरवरून उमेदवारीची घोषणा केली, त्यावेळी भगिरथ भालके हे मंगळवेढा तालुक्‍याच्या दक्षिण भागात संपर्क दौऱ्यात होते. त्यांच्या समर्थकांनी उमेदवारी जाहीर होताच आनंद व्यक्त केला. शिवाय, दौऱ्यात त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे. तरुणांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी अनेक ठिकाणी गर्दी केली होती. 

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना भालके म्हणाले की, गोरगरीब सामान्य, कष्टकरी जनतेचा आशीर्वाद 2009 पासून भारतनानांच्या पाठीशी राहिला, तोच आशीर्वाद आज माझ्या पाठीशी राहणार आहे. महाविकास आघाडीतील सर्व वरिष्ठ पातळीवरील नेते, जनता माझ्या पाठीशी असल्यामुळे या निवडणुकीत मला आव्हान असल्यासारखे वाटत नाही. पोटनिवडणुकीसाठी दोन गट एकत्र आले आहेत. त्यामुळे जनताही एकत्र येऊन माझ्या पाठीशी राहील, असा आशावाद व्यक्त केला. 

स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसेनेच्या उमेदवारांनी केलेल्या बंडखोरीबाबत वरिष्ठ पातळीवरील नेते त्यांच्याशी या संदर्भात बोलतील. उमेदवार म्हणून मी त्यांच्याशी बोलून त्यांना माघारी घेण्याची विनंती करणार आहे. सर्वांच्या एकजुटीमुळे महाविकास आघाडी राज्याप्रमाणे मतदारसंघातही आघाडीवर कशी राहील, यासाठी प्रयत्न करणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये काहीही गैरसमज नव्हते; परंतु विनाकारण गैरसमज पसरवले गेले होते, ते आता दूर झाले आहेत. (स्व.) भारतनानांनी शेवटच्या श्वासापर्यंत विठ्ठल परिवार ज्या पद्धतीने एकसंध ठेवला, त्याच पद्धतीने सर्वांना सोबत घेऊन मी पुढे जाणार आहे, असे भगिरथ भालके यांनी नमूद केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com