रोहित पवारांनी अखेर दूर केली कार्यकर्त्यांची नाराजी
अक्कलकोट : अक्कलकोट शहरातील मेळाव्यास गुरुवारी (ता. 26 नोव्हेंबर) रात्री उपस्थित राहू न शकल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले होते. त्या नाराज कार्यकर्त्यांची आमदार रोहित पवार यांनी आज (ता. 27 नोव्हेंबर) सकाळी शहरात येऊन भेट घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अक्कलकोट येथे गुरुवारी (ता. 26 नोव्हेंबर) रात्री आठ वाजता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे नियोजित असूनही आमदार रोहित पवार त्या ठिकाणी शेवटपर्यंत उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे कार्यकर्त्यांना हिरमोड झाला होता.
रोहित पवार हे अक्कलकोट शहरातील मेळाव्यास शेवटपर्यंत उपस्थित राहू शकले नव्हते. कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी रात्री साडेनऊच्या सुमारास मोबाईलवरून संपर्क साधून मोबाईल माईकला लावून रोहित यांचे भाषण ऐकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पवार हे सोलापूर येथे पत्रकार परिषदेत असल्यामुळे त्यांचे भाषण होऊ शकले नाही. मात्र, आज सकाळी आमदार पवार अक्कलकोटला येऊन कार्यकर्त्यांना भेटून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, गुरुवारी झालेल्या मेळाव्यात उमेश पाटील म्हणाले की, पदवीधर तरुण व शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ताधारी पक्षाबरोबर जाणे गरजेचे आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पदवीधरांच्या मतावर निवडून येऊन महत्वाच्या खात्याचे मंत्री झाले होते. मात्र, त्यांनी बेरोजगार व पदवीधरांसाठी काहीही केले नाही.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे होते. या मेळाव्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्षा शलाका पाटील, कॉंग्रेसचे युवक नेते प्रथमेश शंकर म्हेत्रे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय देशमुख, शहर प्रमुख योगेश पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, शहराध्यक्ष मनोज निकम, कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण जाधव, मंगल पाटील, वर्षा चव्हाण, माया जाधव, वैशाली हावनुर, सुनीता हडलगी, भीमा कापसे, माणिक बिराजदार, जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील उपस्थित होते.
मित्रपक्षांना संपवणारा पक्ष हा भाजप असून त्यापासून मतदारांनी सावध राहावे. अक्कलकोट तालुक्यातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना सर्वात जास्त मतदान व्हावे. सर्वात जास्त मतदान म्हणजे आगामी सर्व निवडणुकीत महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल, असे पाटील म्हणाले.
म्हेत्रे म्हणाले की पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाराष्ट्रातील सर्व जागा जिंकल्यास देशात एक चांगला संदेश जाईल, असे सांगून महाविकास आघाडीची ताकद आपण सर्वांनी दाखवावी व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणावे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.