पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत राजू शेट्टींच्या स्वाभिमानीची उडी 

आमच्या तिघांपैकी कोणालाही उमेदवारी द्या; पण मतदारसंघ स्वाभिमानीकडे घ्या, असे साकडे त्यांनीशेट्टींना घातले आहे.
Raju Shetty's Swabhimani Shetkari Sanghatana claims Pandharpur constituency
Raju Shetty's Swabhimani Shetkari Sanghatana claims Pandharpur constituency

पंढरपूर : पंढरपूर पोटनिवडणुकीसंदर्भात उमेदवारांच्या नावांवरून होत असलेली चर्चा आता पक्षीय पातळीकडे वळली आहे. कारण, महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पंढरपूर विधानसभा मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. स्वाभिमानीच्या या दाव्यामुळे महाविकास आघाडीपुढे विशेषतः राष्ट्रवादी कॉंग्रेसपुढे पेच उभा राहिला आहे. पंढरपूर, मंगळवेढा तालुक्‍यातील कार्यकर्त्यांनी संघटनेचे प्रमुख, माजी खासदार राजू शेट्टींची भेट घेत मतदारसंघासाठी आग्रह धरला आहे. शेट्टींनी त्याबाबत महाआघाडीच्या प्रमुखांशी चर्चा करण्याचे ठरविले आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 17 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. महाविकास आघाडीतील पक्षांसह भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीकडून आमदार भारत भालकेंचे पुत्र भगिरथ अथवा त्यांच्या पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून मिळत आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवारावरच भाजपचा उमेदवार कोण असणार हे निश्‍चित होणार आहे. 

दरम्यान, महाविकास आघाडीत मतदारसंघावरूनच पेच निर्माण होण्याची शक्‍यता आहे. कारण, राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हा मतदारसंघ संघटनेसाठी सोडावा, अशी मागणी केली आहे. या मतदारसंघात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. "रिडालोस'मध्ये 2009 मध्ये सहभागी असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून भारत भालके यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना आव्हान दिले होते. मोहिते पाटील यांचा पराभव करत भालके त्या निवडणुकीत जायंट किलर ठरले होते. विधान परिषदेचे विद्यमान आमदार प्रशांत परिचारक यांनीही 2014 मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवली होती. त्याहीवेळी भालकेंनी परिचारकांना मात दिली होती. 

शेतीमालाच्या हमीभावासाठी तसेच, दूध आणि ऊसदारासाठी राजू शेट्टी यांनी या भागात अनेक आंदोलने केली आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव टाकत शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा मोबदला मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शेट्टी आणि स्वाभिमानीशी जोडलेले शेतकरी, कामगार आणि इतर वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. 

मागील या निवडणुकांचा विचार करून पोटनिवडणुकीसाठी ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडावी, अशी मागणी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्‍यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेट्टींची भेट केली आहे. शेट्टींनीही पंढरपूरच्या जागेसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे आग्रह धरू, असे आश्वासन कार्यकर्त्याना दिले आहे. 

स्वाभिमानीकडून पंढरपूरचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, माजी उपसभापती विष्णूपंत बागल, मंगळवेढा येथील ऍड. राहुल घुले यांनी आमच्या तिघांपैकी कोणालाही उमेदवारी द्या; पण मतदारसंघ स्वाभिमानीकडे घ्या, असे साकडे शेट्टींना घातले आहे. 

मागील विधानसभा व लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राष्ट्रवादी व कॉंग्रेसला पाठींबा दिला होता. त्यावेळी ठरल्यानुसार शेट्टींना विधान परिषदेवर घेण्याचे ठरले आहे. पण, सरकार येऊन दीड वर्ष झाली तरी शेट्टींना अजून संधी मिळालेली नाही. त्यामुळे पंढरपूरची जागा स्वाभिमानीला सोडावी, अशी मागणी होत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com