मंगळवेढा : आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर होणाऱ्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार हा भालके कुटुंबातीलच असणार आहे. याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर लवकरच होणार आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी लतीफ तांबोळी यांनी सांगितले.
सध्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने पंढरपूर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारीवरून सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक नावे चर्चेला येत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पदाधिकारी निवडीवरून होत असलेल्या गोंधळाबद्दल तांबोळी यांनी सांगितले की पक्षीय संघटनेत बदल करताना काहींना नव्या चेहऱ्याला संधी देत असताना जुन्यांना थांबावं लागतं. काहींना संधी मिळत नसते. त्या गोष्टीचा विरोधकांनी अपप्रचार अथवा राजकारण करण्यासारखं काहीच नाही. त्यामध्ये पक्षीय संघटनेत बदल हा ठरलेला असतो.
पोटनिवडणुकीच्या उमेदवारीबाबत मतदारसंघातून भगिरथ भालके यांच्या नावाला पसंती आहे. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये देखील त्याच नावाला हिरवा कंदील दिल्याचा संदेश वरिष्ठ पातळीवर आहे, त्यामुळे दुसऱ्या नावांची चर्चा करणे व्यर्थ आहे. तसेच, पंढरपूर मतदारसंघातून पार्थ पवार हे पोटनिवडणूक लढवणार असल्याची चर्चा ही निरर्थक आहे. कारण, खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे पार्थ पवारांच्या नावाची चर्चा यापूर्वीच संपुष्टात आली आहे, असे तांबोळी यांनी नमूद केले.
पंढरपूर मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विचाराचा बालेकिल्ला असल्यामुळे पक्षाच्या विचाराचा उमेदवार या मतदारसंघातून विजयी होणार आहे. लवकरच उमेदवार निश्चित होऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून या मतदारसंघातील उमेदवार जाहीर होणार आहे.
पोटनिवडणूक नाममात्र आहे. निकाल ठरलेला आहे. (स्व.) भारत भालके यांनी कोरोनाच्या संकटात देखील आपला जीव धोक्यात घालून मंगळवेढा उपसा सिंचन योजना व तालुक्यातील रखडलेल्या प्रश्नासाठी रात्रीचा दिवस केला आहे. त्यांच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीतील साडेतीन वर्षे शिल्लक आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष भालके कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे सोशल मीडियातून होत असलेल्या कोणत्याही अफवेवर कार्यकर्ते व मतदारांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन लतीफ तांबोळी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.