सोलापूर : अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील बंधाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्याबाबत भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत परिचारक यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाचा फोडली.
पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी या प्रश्नी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे बैठक लावण्याचे आश्वासन दिले. मात्र, पाटील दौऱ्यावर असल्याने ही बैठक उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे लावा, अशी विनंती परिचारकांचे मित्र आमदार संजय शिंदे यांनी बैठकीतच केली.
त्यावर पालकमंत्र्यांनी सांगितल्यानुसार आज (ता. 25 जानेवारी) अजितदादांकडे ती बैठक पार पडली. परिचारकांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्र्यांनी अवघ्या एका बैठकीतच 13 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर केला.
पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक आज (ता. 25 जानेवारी) पार पडली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील बंधारे दुरुस्तीच्या विषयावर तत्काळ बैठक घेतली. आमदार प्रशांत परिचारक यांनी मांडलेला प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्याच बैठकीत चुटकीसरशी सोडविला. सोलापूर जिल्ह्यातील बंधाऱ्यांसाठी 13 कोटी 50 लाख रुपयांचा निधी देण्याचे तत्वत: मान्यही केले.
बंधारे दुरुस्तीसाठी सोलापूर जिल्ह्याला निधी दिला असल्याचा समज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा झाला होता. पण, निधी मिळाला नसल्याचा मुद्दा आमदार परिचारक यांनी या बैठकीत निदर्शनास आणून दिला. त्यासाठी त्यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे राज्याचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करून खातरजमाही केली.
"सोलापूर जिल्ह्यातील बंधाऱ्यांचे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना तुम्ही मला याबाबतची कल्पना का दिली नाही?' अशा शब्दांत सोलापूर जिल्ह्यातील जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची कानउघडणी उपमुख्यमंत्री पवार यांनी केली.
जिल्ह्यातील बंधारे दुरुस्तीसाठी दिलेला 13 कोटी 50 लाख रुपयांचा निधी तातडीने खर्च करा. बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी मार्गी लावा, अशा सूचनाही पवार यांनी आजच्या बैठकीत दिल्या. या बैठकीला पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, आमदार प्रशांत परिचारक, आमदार शहाजी पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके आदी उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यातील भीमा, सीना, नीरा, बोरी नदीवरील जवळपास 35 कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे नुकसान झाले आहे. बंधाऱ्यांचे भराव वाहून गेले आहेत. त्यामुळे या बंधाऱ्यांवर असलेल्या पाणी योजनांना पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करताना अडथळे येत आहेत. पावसाळ्यापूर्वी बंधाऱ्यांची दुरुस्ती न झाल्यास आगामी काळात कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा प्रश्न जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर आज मांडला. तो अजितदादांनी निधी देऊन मार्गी लावला आहे.
- प्रशांत परिचारक, आमदार
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.