चुकीला माफी नाही ; बीडच्या 'सिंघम'ने केले इतके पोलिस निंलबित  

बीडचे एसपी हर्ष पोद्दार यांनी आठ दिवसांत पाच लाचखोर पोलिसांना निलंबित केले.
4Beed_SP_Poddar.
4Beed_SP_Poddar.

बीड : लाचखोरीची तक्रार, मग चौकशी, धुळ खात पडलेला अहवाल असे शासकीय कार्यालयातील चित्र. पण, बीडच्या एसपींनी मात्र 'चुकीला माफी नाही आणि लाचखोरांची गय नाही' असा जनतेला संदेश आणि लाचखोरांना कारवाईतून इशारा दिला आहे. हर्ष पोद्दार यांनी आठ दिवसांत पाच लाचखोर पोलिस निलंबित केले.

पोलिस दलाबाबत जनतेच्या मनात कायम नकारात्मक भावना असते. सामान्यांना पोलिसांकडून मिळणारी वागणूक आणि आर्थिक पिळवणूक, अशी ही यामागील दोन कारणे आहेत. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रसार रोखण्यासाठी सुरु असलेले लॉकडाउन आणि संचारबंदीच्या काळात मात्र डॉक्टर, नर्स यांच्यासोबत पोलिस आणि सफाई कामगारांनाही सामान्यांनी देवदुत नाव दिले. कारण, कोरोनाच्या काळजीपोटी सर्वसामान्य घरात असताना हे घटक देवदुताप्रमाणे भर उन्हाताणात आपल्या रक्षण, संरक्षण आणि उपचारासाठी अहोरात्र झटत आहेत. मात्र, हाताची पाच बोटे सारखी नसतात म्हणतात तसे अशा परिस्थितीतही काहींचा लाचखोरीचा मोह सुटायला तयार नाही. 

अशी काही लाचखोरीची प्रकरणे घडली तरी पोलिसांविरुद्ध तक्रारीला कोणी समोर येत नाही. तक्रार झाली तरी चौकशी, जाब - जबाब असा अनेक महिने फाईलींचा प्रवास सुरु असतो. पण, बीडचे एसपी हर्ष पोद्दार यांनी मात्र लाचेचे प्रकरण समोर येताच थेट सस्पेंड असा पॅटर्न राबविणे सुरु केले आहे. यामुळे लाचखोरांची गय केली जात नाही, असा सामान्यांना विश्वास पटल्याने तक्रारींसाठीही नागरिक पुढे येत आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर संचारबंदी व लॉकडाउन सुरु झाले. या पार्श्वभूमीवर पोलिस दलाने जिल्ह्यांच्या सीमांवर २३ ठिकाणी चेकपोस्ट उभारले. 

बाहेरील जिल्ह्यातून जिल्ह्यात येणारे प्रवासी नागरिकांचे पास व कागदपत्रे यांची पाहणी करून त्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करुन जिल्ह्यात प्रवेश देण्यात येत आहे. त्यामुळे क्वारंटाइन व इतर प्रक्रीया करण्यास मदत हेाते. मात्र, मागच्या काही दिवसांत लोक विना परवाना जिल्ह्यात येत आहेत. जिल्ह्याच्या हद्दींवरील औरंगाबाद, नगर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांसह पुणे, मुंबईसारखे कोरोनाबाबतच्या कंन्टेमेंट झोनमधील जिल्ह्यांतूनही काही लोक असे जिल्ह्यात प्रवेश करत असल्याच्या तक्रारी होत्या. काही लोक येत असताना पोलिस कानाडोळा करतात वा काही ठिकाणी अशा नागरिकांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी होत्या. याची खुद्द एसपी हर्ष पोद्दार व अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांनी दखल घेतली.

आठ दिवसांत पाच पोलिस निंलबित

आठ दिवसांपूर्वी त्यांनी चेकपोस्टवर या प्रकाराची शहानिशा करण्यासाठी डमी प्रवाशी पाठविला. यामध्ये गेवराई पोलिस ठाणे हद्दीतील चेकपोस्टवर डमी प्रवाशाने जिल्ह्यात येण्यासाठी विनंती केल्यावर तेथील कर्मचारी एस. बी. उगले यांनी त्यांच्याकडे पैश्याची मागणी केली. त्यांना पोलिस हवालदार एम. के. बहीरवाळ, पोलिस नायक डी. बी. गुरसाळे, पोलिस नायक एस. बी. उगले यांनी मदत केली त्यामुळे या तिघांना पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर तीनच दिवसांनी शहरातील शिवाजी नगर पोलिस ठाण्यातील एक कर्मचारी पकडलेले वाहन सोडण्यासाठी पैसे मागत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. बालाजी मुळे नावाचा या पोलिस कर्मचाऱ्यालाही त्याच दिवशी सस्पेंड ऑर्डर देऊन टाकली. एकूणच लाचखोरीबाबत एसपी कठोर असल्याचा संदेश सामान्यांमध्ये गेला. म्हणूनच एकाने सोडतीन महिन्यांपूर्वी त्याला प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलिस कर्मचारी पैस मागत असल्याची क्लिप व्हायरल केली. पैसे मागणाऱ्या पेठ बीड पोलिस ठाण्यातील अर्जुन राख या पोलिसाला निलंबित करण्यात आले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com