अमरिंदरसिंग यांच्याशी सिद्धू जुळवून घेतील का? 

हरिश रावत यांनी दिल्लीत येऊन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन परिस्थितीची कल्पना त्यांना दिली.
Sarkarnama (55).jpg
Sarkarnama (55).jpg

नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच अमरिंदर यांना हटविण्यासाठी मोहीम सुरू झाली. या दोन्ही नेत्यांकडून शक्तीप्रदर्शनही करण्यात आले. यामुळे निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसमध्ये दुफळी माजल्याच्या चर्चा सुरू झाल्या. सिद्धू यांची आक्रमक भूमिका पाहता अमरिंदर यांना बदलण्यात येण्याची शक्यता देखील वर्तवली जाऊ लागली होती. त्यात सिद्धू यांच्या सल्लागारांनी काश्‍मीरबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने दिल्लीतील काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. 

पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक समोर असतानाच काँग्रेसमधील वादाला कारणीभूत ठरलेले प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांना काँग्रेसने दिल्लीतून लगाम घातला आहे. पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी अमरिंदरसिंग कायम राहणार असल्याचे स्पष्ट करतानाच सिद्धू यांना मुख्यमंत्री सिंग यांच्या समवेत काम करण्याच्या सक्त सूचना पक्षाकडून देण्यात आल्या आहेत. सिद्धू यांनी आणखी आक्रमक पवित्रा घेतला. ‘मला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्या, अन्यथा सडेतोड उत्तर देईल,’ असे म्हणत थेट नेतृत्वालाच आव्हान दिले. त्यानंतर हरिश रावत यांनी दिल्लीत येऊन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन परिस्थितीची कल्पना त्यांना दिली.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील वाद विकोपाला जाणे योग्य नव्हे, असे त्यांनी वरिष्ठ नेत्यांना सांगितले. त्यावर पक्षनेतृत्वाचा निरोप घेऊन रावत चंडीगड येथे पोचले. त्यांनी सिद्धू आणि अन्य नेत्यांबरोबर चर्चा केली. अमरिंदर यांच्याबरोबर तुम्हाला काम करावे लागेल. निवडणुका तोंडावर असताना सिंग यांना मुख्यमंत्री पदावरून हटविता येणार नाही, असे पक्ष नेतृत्वाने स्पष्ट केल्याचे त्यांनी सिद्धू यांना सांगितले.


हरिश रावत हे अमरिंदरसिंग यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार करून सिद्धू यांचे काही समर्थकांना स्थान देण्याबाबत चर्चा होऊ शकते. त्यातून सिद्धू यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. परंतु पक्षनेतृत्व या विस्तारालाही अनुकूल नाही. यामुळे अन्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते, अशी दिल्लीतील नेत्यांना वाटते आहे.

राज्यांमध्ये काँग्रेसमध्ये सुंदोपसुंदी सुरू
केवळ पंजाबच नव्हे; तर राजस्थान, आसाम, त्रिपुरा, छत्तीसगड यांसह काही राज्यांमध्ये काँग्रेसमध्ये सुंदोपसुंदी सुरू आहे. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सुश्‍मिता देव यांनी पक्षाला रामराम करीत तृणमूलमध्ये प्रवेश केला. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि टी. एस. सिंहदेव यांच्यात वाद आहेत. महाराष्ट्रातही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीबाबत अन्य नेत्यांमध्ये नाराजी आहे. दिल्लीतील नेत्यांचे या प्रकारांवर लक्ष असले, तर त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न होताना दिसत नसल्याचे चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com