चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांनी पुढील आठवडाभर कुणालाही न भेटण्याचा निर्णय घेतला आहे. त्या चेन्नईतील आपल्या घरीच राहणार आहेत. तमिळनाडूतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना शशिकला यांच्या एकांतवासानेही विरोधकांना धडकी भरली आहे.
शशिकला या चार वर्षाच्या तुरूंगवासानंतर तमिळनाडूत परतल्या आहेत. तुरूंगात असतानाच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. रुग्णालयातून सोडण्यात आल्यानंतर त्या आठवडाभर बेंगलुरूमध्ये विलग राहिल्या. तिथून त्या नुकत्याच चेन्नईत परतल्या आहेत. जवळपास 24 तासांचा प्रवास अन् समर्थकांनी केलेल्या उत्स्फूर्त स्वागतानंतर त्या थेट चेन्नईतील घरी गेल्या.
हेही वाचा : शशिकला यांच्या परतण्याने भाजपला होणार फायदा...
शशिकलांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषत: अण्णाद्रमुक पक्षात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. शशिकलांच्या सुटकेमुळे राज्यात बदलणाऱ्या राजकीय समीकरणांचा धसका मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या गटांनी एकत्र येऊन शशिकलांच्या विरोधात रणनीती आखण्यास सुरवात केली आहे.
अशा परिस्थितीत शशिकला यांनी आठवडाभर कुणालाही न भेटण्याचा निर्णय घेतला आहे. त्या चेन्नईतील घरीच थांबणार आहेत. त्यांच्यासोबत जे इलावरासी या नातेवाईक असतील. त्यांनाही शशिकला यांच्यासोबत तुरूंगवास भोगावा लागला आहे. शशिकला यांना आराम करण्यास सांगितल्याने त्या पुढील आठवड्यात कार्यकर्त्यांना भेटतील, असे सुत्रांनी सांगितले.
स्वागतासाठीचे कार्यकर्ते भाडोत्री...
अण्णाद्रमुक सरकारमधील मंत्री जयकुमार यांनी शशिकलांचे स्वागत करणारे लाखो कार्यकर्ते हे भाडोत्री असल्याचे म्हटले आहे. शशिकलांचे भाचे टी.टी.व्ही. दिनकरन यांनीच पैसे देऊन ही गर्दी जमवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शशिकला आणि दिनकरन हे राज्यात हिंसाचार पसरवणार असल्याचा आरोप करीत जयकुमार यांनी नुकतीच राज्याच्या पोलीस महासंचालकांची भेट घेतली होती.
या आरोपांवर शशिकलांचे भाचे व अम्मा मक्कल मुनेत्र कळघमचे आमदार टी.टी.व्ही. दिनकरन यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी आजपर्यंत कधीही कोणत्या नेत्याचे एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वागत झालेले पाहिले नव्हते. सत्ताधारी पक्षाने मोठे निर्बंध घालून आणि दबाव टाकूनही कार्यकर्ते जमले. प्रचंड गर्दी जमूनही कोणताही हिंसाचार झाला नाही आणि सगळे काही लष्करी शिस्तीत पार पडले. अनेक नेत्यांनी ही गर्दी केवळ हिंसाचारासाठी जमवली आहे, असे वाटत होते. शशिकलांच्या स्वागतासाठी जमलेले सगळे जण हे अम्माचे खरे कार्यकर्ते होते.
Edited By Rajanand More

