राजस्थानात कॉंग्रेसचा वाद मिटला अन्‌ भाजपचा सुरू झाला ! 

जेव्हा पायलट परतले नव्हते तेव्हा गेहलोत यांनी आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला होता.
राजस्थानात कॉंग्रेसचा वाद मिटला अन्‌ भाजपचा सुरू झाला ! 

जयपूर : राजस्थानातील कॉंग्रेसचा अंतर्गत वाद मिटला. आता भाजपमध्ये सुरू झाला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावरील विश्वास ठरावावेळी भाजपचे चार आमदार अनुपस्थित राहिले होते. या चारहीजणांकडून पक्षाने खुलासा मागविला आहे. 

कॉंग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी बंडखोरी केल्यानंतर गेहलोत सरकार अडचणीत सापडले होते. नाराजीनाट्य जवळजवळ महिनाभर सुरू होते. पायलट हे भाजपच्या गळाला लागल्याची टीकाही त्यांच्यावर करण्यात आली होती. स्वत: गेहलोत यांनी त्यांना निकम्मा म्हटले होते. भाजपशी हातमिळवणी करून ते सरकार पाडायला निघालेत असा आरोपही पायलट यांच्यावर झाला होता. 

पायलट समर्थक आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी नोटीसही पाठविली होती. हे सर्व प्रकरण न्यायालयात गेले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर गेल्या शुक्रवारी गेहलोत सरकार बहुमत सिद्ध करणार होते. मात्र त्यापूर्वीच पायलट हे पुन्हा कॉंग्रेसमध्ये दाखल झाले आणि गेहलोत यांचे मुख्यमंत्रीपद वाचले. 

जेव्हा पायलट परतले नव्हते तेव्हा गेहलोत यांनी आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला होता. कोणत्याही परिस्थितीत विश्वासदर्शक ठराव जिंकणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. गेल्या शुक्रवारी विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी मात्र भाजपचे चार आमदार अनुपस्थित राहिल्याने राजस्थानात जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

हे चार आमदार गेहलोत यांना मिळाले तर नाहीत ना अशी शंकाही उपस्थित होत होती. ते का अनुपस्थित राहिले याची चिंता भाजपमध्ये होती. 
आज राजस्थान प्रदेश भाजपने या चारही जणांकडून खुलासा मागविला आहे. या चारही जणांना जयपूरला बोलविण्यात आले आहे. 

भाजपचे नेते आणि विरोधीपक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी पीटीआयला सांगितले, की विश्वासदर्शक ठरावाच्या पार्श्वभूमीवर पक्षाने सर्व आमदारांना व्हीप बजावला होता आणि त्यांनी सभागृहात हजर राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. सभागृहाचे कामकाज सुरू झाले.

पुढे कामकाज रद्द करण्यात आले. त्यानंतर हे चारही आमदार निघून गेले. सभागृहाचे कामकाज पुन्हा जेव्हा सुरू झाले तेव्हा हे चारही जण अनुपस्थित होते. गोपीचंद मीना, कैलास मीना, हरेंद्र निनामा आणि गौतम मीना अशी चारजणांची नावे आहेत. 

राजस्थानात भाजपचे 73 आमदार आहेत. गेहलोत सरकारविरोधात मतदान झाले असता भाजपच्या 68 जणांनी मतदान केले. उर्वरित या चारजणांसह पाच मते कुठे गेली याची चर्चा सुरू होती. हे चारही आमदार अनुपस्थित राहिल्याने भाजपचे नेते नाराज झाले होते.

विरोधीपक्षनेते कटारिया म्हणाले, की भाजपचे प्रदेशाध्यक्षांसह या चार आमदारांशी चर्चा केली आहे. त्यांच्याकडून आलेल्या खुलाशानंतर समाधान झाले तर ठीक अन्यथा योग्य ती पक्षातर्फे कारवाई केली जाईल. 

गेल्या शुक्रवारी गेहलोत सरकारने विश्वासदर्शक ठराव आवाजीमतांनी जिंकला होता.  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com