संसदीय संरक्षण समितीच्या बैठकांना राहूल गांधींच्या दांड्या...

संसदेच्या संरक्षण समितीचे सदस्य असूनही या समितीच्या एकाही बैठकीला कॉंग्रेस नेते राहूल गांधी हजर राहिलेले नाहीत. आणि चीन मुद्यावर ते आता वारंवार लष्कराचे मनोधौर्य खच्ची करत आहेत, असा घणाघाती हल्ला भाजपाध्यक्ष जे. पी नड्डा यांनी आज चढविला.
4Rahul_20Gandi_20JP_20Nadda
4Rahul_20Gandi_20JP_20Nadda

नवी दिल्ली : संसदेच्या संरक्षण समितीचे सदस्य असूनही या समितीच्या एकाही बैठकीला कॉंग्रेस नेते राहूल गांधी हजर राहिलेले नाहीत. आणि चीन मुद्यावर ते आता वारंवार लष्कराचे मनोधौर्य खच्ची करत आहेत, असा घणाघाती हल्ला भाजपाध्यक्ष जे. पी नड्डा यांनी आज चढविला. 


चीन विवाद सुरू झाल्यापासून राहूल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने ट्‌विटद्वारे टीका करत आहेत. मोदी यांनी आतापावेतो गांधी यांना थेट प्रत्युत्तर देणे महत्वाचे मानलेले नाही. मात्र, नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा निवडक मंत्र्यांसह सरकारची बाजू लढवत आहेत. राहूल यांच्याच विधानांना आधार बनवून भाजप त्यांच्यावर पलटवार करत आहे. भाजपच्या बंगाल जनसंवाद ऑनलाईन सभेत बोलताना त्यांनी देशासाठी बलिदान करणारे श्‍यामाप्रसाद मुखर्जी हे बंगालचे सुपुत्र होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही चिमटा काढला. 


नड्डा यांनी आज चीन मुद्यावरून गांधी घराण्याचा पुन्हा उध्दार केला. कॉंग्रेसकडून यावर तत्काळ प्रत्युत्तर आलेले नाही. संसदीय समित्याच्या बैठकांना हजर राहणाऱ्या सदस्यांना दरवाजाशी ठेवलेल्या रजिस्टरमध्ये स्वाक्षरी करावी लागते. त्यानंतर त्यांची उपस्थिती ग्राह्य धरली जाते. या समित्या मिनी पार्लमेंट मानल्या जात असल्याने त्यांच्या बैठकांना खासदारांनी हजर राहिलेच पाहिजे. यासाठी राज्यसभा सभापती वेंकय्य नायडू विशेष आग्रही असतात. या बैठकांना हजर न राहिलेल्यांची नावे सरळ पेपरात छापा, असे त्यांनी मागील अधिवेशनात जाहीरपणे सांगितले होते. 


नड्डा म्हणाले की राहूल गांधी अशा गौरवशाली वंशपरंपरेतील आहेत ज्यांच्यासाठी संरक्षण संसदीय समित्या नव्हे तर कमिशन महत्वाचे ठरत असते. राहूल गांधींनीही या समितीच्या एकाही बैठकीत येण्याची तसदी घेतलेली नाही. आणि तेच आता आमच्या सैन्यदलांचे मनोधैर्य कच्ची करणारी टीका सतत करत आहेत. सशस्त्र दलांच्या शौर्यावर, बहादुरीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत आहेत हे दुःखद आहे. देशावरील संकटाच्या काळात एका जबाबदार विरोधी पक्षीय नेत्याने जे करू नये तेच राहूल गांधी करत आहेत. कॉंग्रेसमध्ये संसदीय कामकाजाचे सखोल ज्ञान व माहिती असणारे अनेक योग्य सदस्य आहेत. पण एक राजवंश त्यांची वाट अडवून त्यांना पुढे येऊ देत नाही हे खेदकारक आहे. 


वस्तुस्थिती काय आहे ? 

संसदीय समित्यांच्या बैठकांना उपस्थिती जेमतेम असल्याचे वारंवार सांगितले जाते. लोकसभा संकेतस्थळावरील नोंदींनुसार 17 व्या लोकसभेत संरक्षणविषयक स्थायी समितीची पहिली बैठक 27 सप्टेंबर 2019 रोजी झाली. यंदा 12 मार्चला या समितीची 11 वी बैठक झाली. या समितीच्या एकाही पहिल्या बैठकीस सर्वाधिक म्हणजे 30 पैकी 20 खासदार हजर राहिले होते. त्यातही राहूल गांधी यांचे नाव नाही. ते एकदाही या समितीच्या बैठकीला उपस्थित नसल्याचे यावरून दिसते. या समितीने मागील वर्षी 4 ते 9 नोव्हेंबरदरम्यान गंगटोक, नाथुला दर्रा, गुवाहाटी, तवंग, शिलॉंग या भागाचा दौरा केला होता. त्यातही गांधी सहभागी नव्हते. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com