शेतकऱ्यांमधील गैरसमज दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील : राष्ट्रपती

शेतकऱ्यांमधील गैरसमज दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद सांगितले.
ram29.jpg
ram29.jpg

नवी दिल्ली : "भारताने जगातील अनेक देशांना कोरोना लस पुरविली आहे. देशात जगातील सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहीम राबविली जात आहे. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होत आहे," असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज सांगितले. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेला हिंसाचार दुर्भाग्यपूर्ण होता, अशी खंत राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केली. शेतकऱ्यांमधील गैरसमज दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. 

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरवात झाली. यावेळी राष्ट्रपती कोविंद बोलत होते. ते म्हणाले की यंदाचे अधिवेशन महत्वाचे आहे. देशात कोराना रूग्णाची संख्या कमी होत आहे. कोराना काळात सरकारने घेतलेल्या निर्णयाचा सरकारला फायदा झाला. सरकारने गरीबांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. गरीबांसाठी स्वस्त धान्य योजना महत्वपूर्ण ठरली आहे. देशातील कोणीही उपाशी राहू नये, याकडे देशाचे लक्ष आहे. 

या अधिवेशनावर शेतकरी आंदोलनाचे सावट आहे. सत्ताधारी मोदी सरकारला पेचात अडकवत त्यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्हं उपस्थित करत काँग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूल, आप, अकाली दल, द्रमुक, सीपीआय, माकप, सपा आणि राजद अशा पक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला आहे. 

गेल्या पावसाळी अधिवेशनात कृषी कायद्यांच्या मुद्दय़ावर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडलेल्या अकाली दलाने तसेच आम आदमी पक्षानेही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे. कृषी कायद्यांना ‘आप’ने विरोध केल्याचे पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी सांगितले. विरोधी पक्षांच्या संयुक्त निवेदनात या दोन पक्षांचा समावेश नसला तरी शेती कायद्यांच्या प्रश्नावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी पक्षाला घेरण्याची व्यूहरचना विरोधकांकडून आखली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या अर्थंसंकल्पात मागच्या दोन वर्षांमधील देशाच्या आर्थिक वाटचालीचा अहवाल आणि सोबतच अडचणींवर मात करत आर्थिक क्षेत्रात देशाची वाटचाल नेमकी कोणत्या दिशेनं राहिली यासंदर्भातील अहवाल सादर करण्यात येणार आहे.

देशातील १६ विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. दरम्यान, दिल्लीतील हिंसाचारास जबाबदार ठरवून सरकार आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असले तरी कृषी कायदे रद्द केल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com