नवी दिल्ली : भूमीच्या पावित्र्याची पूजा करण्याची प्रवृत्ती प्रत्येक भारतीयांमध्ये विविध रूपाने विद्यमान आहे. माझी देशभक्ती ही माझ्या धर्मातून आली आहे, असे महात्मा गांधी सांगायचे. हिंदू आहे म्हणजे त्याला देशभक्त असायलाच हवे, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काल केले होते. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भागवत यांना काही प्रश्न विचारले आहेत.
Will Bhagwat answer: What about Gandhi's killer Godse? What about the men responsible for Nellie massacre, anti-1984 anti-Sikh & 2002 Gujarat pogroms?
It's rational to assume that most INDIANS are patriots regardless of their faith. It's only in RSS's ignorant ideology....[1/2] https://t.co/fZv3GpmlIg
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) January 1, 2021
एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी याबाबत टि्वट करून डॉ. मोहन भागवत यांना प्रश्न विचारले आहेत. आपल्या टि्वटमध्ये ओवेसी म्हणतात, ''गांधींची हत्या करणारा गोडसेविषयी काय सांगाल? नेल्ली हत्याकांड, १९८४ शीख विरोधी दंगल आणि २००२ गुजरात दंगलीला जबाबदार असणाऱ्या लोकांबद्दल काय बोलणार?,” असा सवाल ओवैसी यांनी उपस्थित केला आहे. बहुतेक भारतीय विश्वास न ठेवता देशभक्त आहेत, असं समजणं तर्कसंगत आहे. हे फक्त आरएसएसच्या अज्ञानी विचारधारेमध्ये आहे''
'मेकिंग ऑफ ए हिंदू पेट्रियॉट- बैकग्राउंड ऑफ गांधीजीज हिंद स्वराज' पुस्तकाचे प्रकाशन सरसंघचालक डॉ. भागवत यांच्या हस्ते काल राजघाट परिसरात करण्यात आले. यावेळी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल उपस्थित होते. सामाजिक समीक्षण केंद्रातर्फे हर आनंद प्रकाशनाच्या सहकार्याने सदर शोधग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे.
देशभक्त ही संज्ञा मोजक्याच लोकांसाठी वापरायची, असे आम्ही कधीही मानत नाही. भारतात तरी प्रत्येक व्यक्तीमध्ये या भूमीला पवित्र मानण्याची, आपले मानण्याची एक प्रवृत्ती आहे. भूमीच्या पावित्र्याची पूजा करण्याची प्रवृत्ती प्रत्येक भारतीयांमध्ये विविध रूपाने विद्यमान आहे. मात्र, महात्मा गांधीजी जे म्हणाले, ते विचार करण्यासारखे आहे. माझी देशभक्ती ही माझ्या धर्मातून आली आहे. त्यामुळे हिंदू आहे म्हणजे तो आपोआपच देशभक्तही आहेच, त्याला ते असायलाच हवे.
अर्थात, त्याला झोपेतून जागे करावेच लागते. मात्र, भारतविरोधी अथवा भारतद्रोही असा कोणीही नसतो. त्यामुळे ‘हिंदू देशभक्त’ ही संज्ञा म्हणजे ‘वदतो व्याघात्’ असा प्रकार आहे, असे भागवत म्हणाले. भारतीय स्वातंत्र्यलढा म्हणजे केवळ परकीय राजकीय सत्ता घालवणे, असे गांधीजींचे मत नसल्याचे सरसंघचालकांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, भारतीय स्वातंत्र्यलढा हा दोन संस्कृतींमधील संघर्ष म्हणजे पाश्चात्त्य संस्कृती विरुद्ध भारतीय संस्कृतीचा लढा होता.
दुसऱ्यांना दोष देण्यात अर्थ नाही, आपल्या जीवनात काहीतरी कमतरता आली म्हणूनच पारतंत्र्य भोगावे लागले, गुलामी भोगावी लागली. त्यामुळे अगोदर स्वत:मधल्या कमतरतांना दूर करावे, असे डॉ. हेडगेवार सांगत असत. त्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये गांधीजींचेच प्रतिबिंब दिसत असल्याचेही भागवत यांनी यावेळी नमूद केले.

