नवी दिल्ली : माता मृत्यूदर रोखण्यासाठी मुलीच्या लग्नाचे वय वाढविण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातून दिले. याबाबत अभ्यास करण्यासाठी सरकारकडून नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल येताच मुलीच्या लग्नाच्या वयाबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही मोदी यांनी सांगितले.
लाल किल्ल्यावर ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे देशाला उद्देशून भाषण झाले. त्यात त्यांनी अनेक घोषणा केल्या. त्यावेळीच त्यांनी मुलीच्या लग्नाच्या वयासंदर्भातही सूतोवाच केले.
देशात सध्या मुलीच्या लग्नाचे वय 18 वर्षे इतके आहे. पण, अठरा वर्षांपर्यंत मुलीची शारीरिक वाढही झालेली नसते. तसेच, तिच्या शैक्षणिक वाटचालीत खंड पडतो. त्यामुळे अठरा वर्षांपर्यंत तिचे ना शिक्षण पूर्ण होते ना तिची शारीरिक वाढ होते, त्यामुळे मुलीच्या लग्नाच्या वयात वाढ होण्याची गरज या क्षेत्रात काम करणाऱ्यांकडून बोलून दाखवली जात होती.
या वेळी मोदी म्हणाले, महिलांना ज्या ज्या वेळी संधी मिळाली, त्या त्या वेळी त्यांनी देशाला मजबूत करत देशाचा नावलौकिक वाढवला. महिलांना रोजगार स्वयंरोजगाराच्या समान संधी देण्याबाबत सरकार कटिबद्ध आहे. भारताच्या नौसेनेत आणि हवाई दलात महिलांना संधी दिली जात आहे. गर्भवती महिला कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांची पगारी रजा दिली जात आहे.
गरीब महिला, मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने जनऔषधी दुकानातून एक रुपयात सॅनिटरी पॅड उपलब्ध करून दिले जात आहेत. मुलींमधील कुपोषणाचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने मुलीच्या लग्नाचे वय काय असावे, यासाठी सरकारने एक समिती नेमली आहे, त्याचा अहवाल येताच योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे मोदी यांनी सांगितले.
देशात बालविवाह प्रतिबंधात्मक कायदा असला तरी बालविवाहाच्या बातम्या अधूनमधून येत असतात. त्यामुळे माता मृत्यूचे प्रमाण आपल्याकडे दिसते. तसेच, अठराव्या वर्षी लग्न केल्यानंतर त्या मुलीला अनेकदा 19 व्या वर्षीच मातृत्व स्वीकारावे लागते. संबंधित मुलीची शारीरिक वाढ व्यवस्थित झाली नसल्यास बाळंतपणात तिला अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाय बाळाचेही पोषण व्यवस्थित होत नाही. त्यातून माता मृत्यूचे प्रकार घडतात, त्याला या नव्या नियमामुळे आळा बसू शकतो.
हेही वाचा : नरेंद्र मोदींसोबत या होत्या फ्लॅग ऑफिसर
नवी दिल्ली : स्वातंत्रदिनी लाल किल्ल्यावर पंतप्रधानासोबत झेंडावंदन करताना फ्लॅग ऑफिसर उपस्थित असतात. यंदा ही संधी मेजर श्वेता पांडे यांनी मिळाली. मेजर श्वेता पांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिंरगा फडकविण्यात मदत केली. जाणून घेऊयात कोण आहेत या श्वेता पांडे.
श्वेता पांडे या लष्करातील 505 बेस वर्कॅशॉप येथे (इलेक्ट्रॉनिक आणि मैकेनिकल इंजीनियर) अधिकारी आहेत. या वर्षी जूनमध्ये मास्को येथील विजय दिवसाच्या संचालनात सहभागी झाल्या होत्या. मेजर पांडे या मुळच्या लखनौ येथील आहेत. मार्च 2012 मध्ये चेन्नई येथील अधिकारी प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतले आहे. त्यांचे वडील राज रतन पांडे हे उत्तरप्रदेश सरकारच्या वित्त विभागात अतिरिक्त संचालक म्हणून कार्यरत होते. तर आई अमिता पांडे या संस्कृत, हिंदी या विषयाच्या प्राध्यापिका आहेत.
Edited By Vijay Dudhale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.