डाव्यांना सुरूंग लावला त्याच मतदारसंघातून भाजपला सुरूंग लावण्याची ममतांची तयारी

पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
Mamata Banerjee will contest from nandigram constituency
Mamata Banerjee will contest from nandigram constituency

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज आगामी निवडणूक नंदिग्राममधून लढणार असल्याचे जाहीर केले. याचवेळी पारंपरिक भवानीपूर मतदारसंघ त्यांनी सोडला आहे. नंदिग्राममधूनच दहा वर्षांपूर्वी डाव्यांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावत ममतांनी सत्तांतर घडवले होते. आता या मतदारसंघातून निवडणूक लढवत त्यांनी भाजपलाही सुरूंग लावण्याची तयारी केल्याची चर्चा आहे.

ममता बॅनर्जी यांनी आज पश्चिम बंगालमधील निवडणूकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. 294 पैकी 291 जागांवर तृणमूलचे उमेदवार असतील. तर तीन जागा गोरखा जनमुक्ती मोर्चाला देण्यात आल्या आहेत. यामध्ये 50 महिला व 42 मुस्लिम उमेदवारांचा समावेश आहे. तर सध्या आमदार असलेल्या 23 ते 24 जणांना वय आणि इतर कारणांमुळे उमेदवारी नाकारण्यात आले असल्याचे ममता यांनी जाहीर केले. तसेच त्या नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचेही यावेळी जाहीर केले.

ममतांनी आज नंदिग्राममधून लढण्याची तयारी मागील काही दिवसांपासूनच सुरू केली होती. आज त्यांनी अधिकृतपणे घोषणा करत त्यावर शिक्कामोर्तब केले. नंदिग्राम हा तृणमूल सोडून भाजपमध्ये गेलेले सुवेंदू अधिकारी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. नंदिग्रामवर अधिकारी कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. कधीकाळी तृणमूल काँग्रेसचे निष्ठावंत अशी त्यांची ओळख होती पण सुवेंदू यांनी बंडाचा झेंडा रोवत भाजपशी हातमिळवणी केली आहे. त्यानंतर येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. 

सुवेंदू हेही याच मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे हा मतदारसंघ तृणमूल व भाजपच्यादृष्टीने प्रतिष्ठेचा ठरणार आहे. दोन्ही नेते मातब्बर असल्याने विजयासाठी जोरदार प्रयत्न केले जातील. ममतादीदींनी जाणीवपूर्वक या मतदारसंघाची निवड केली आहे. 

राज्यामध्ये 2007 मध्ये डाव्यांची सत्ता असताना नंदिग्राममधील रसायन कारखान्याविरोधात शेतकरी आंदोलनाचा भडका उडाला होता. या आंदोलनानंतर 2011 मध्ये डाव्या आघाडीच्या ३४ वर्षांच्या सत्तेला सुरूंग लागून सत्तांतर झाले होते. त्यावेळी ममतांच्या विजयात नंदिग्रामचे महत्व अनन्यसाधारण होते. ममतांचे नंदिग्रामशी भावनिक नातेही आहे. येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 14 लोक ठार झाले होते तेव्हा सर्वप्रथम घटनास्थळी पोचणाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होता. 

नंदिग्राम हे माझ्यासाठी शुभ ठिकाण आहे. माझा पक्ष सोडून जे जात आहेत त्यांची मला फारशी चिंता नाही. जेव्हा तृणमूल काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा यापैकी कोणीही माझ्यासोबत नव्हते, असे ममतादीदी काही दिवसांपूर्वी म्हणाल्या होत्या. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com