नवी दिल्ली : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर व चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात माॅस्कोमध्ये होणाऱ्या भेटीच्या दोन दिवस आधी भारत व चीनमध्ये सीमेवरील तणाव पुन्हा वाढला आहे. पूर्व लडाख क्षेत्रात गोळीबार झाल्याची घटना काल घडली आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून नियंत्रण रेषेवर दोन्ही सैन्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यातच आज या ठिकाणी गोळीबार झाला आहे. उभय देशांमध्ये झालेला करार मोडत भारतीय सैन्याने चीनी सैन्याला इशारा देण्यासाठी हवेत गोळीबार केल्याचा दावा चीनने केला आहे. पॅगाँग त्सू लेकच्या परिसरात ही घटना घडल्याचे चीनचे म्हणणे आहे.
भारतीय सैनिकांनी गोळीबार केल्यानंतर सीमेवरील आमच्या सैनिकांनी परिस्थिती शांत करण्यासाठी योग्य ती पावले उचलली, असा दावा चीनच्या पश्चिम लष्करी विभागाचे प्रवक्ते झँग शुईली यांनी केला आहे. चीनी सैन्यदलाच्या वेबसाईटवर ही माहिती देण्यात आली आहे. मात्र, चीनी सैनिकांनी उलट गोळीबार केला किंवा कसे, याबाबत मात्र कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही.
भारतीय लष्कराने पेगाँग त्सू लेकच्या दक्षिणेकडील भागातील उंच ठिकाणावर नुकतेच नियंत्रण मिळवले आहे. या भागात घुसखोरी करण्याच्या चीनी सैन्याच्या प्रयत्नांना यामुळे खीळ बसली आहे. त्यातून दोन्ही सैन्यांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. कालची गोळीबाराची घटना यातूनच घडली असावी, असा सूत्रांचा अंदाज आहे.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.