नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून, बहुतेस सर्व राज्यांनी निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन निती आयोगाने आधीच उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत सहा लसींना परवानगी दिली असून, लहान मुलांच्या लसीलाही परवानगी देण्यात आली आहे. ती लस सप्टेंबरपासून उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
'कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे भीषण रूप सप्टेंबर महिन्यात दिसू शकते,' अशी भीती नीति आयोगाने व्यक्त केली आहे. नीति आयोगाच्या मते, सप्टेंबर महिन्यात देशात 4 ते 5 लाख कोरोना प्रकरणे दररोज येऊ शकतात. 'तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पुढच्या महिन्यात दीड लाख ‘आयसीयू बेड’ तयार ठेवले पाहिजे,’’ असे मत निती आयोगाने व्यक्त केले आहे.
कोरोना संसर्गासाठीच्या लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना तिसरा बूस्टर डोस देण्याबाबत अद्याप विचार करण्यात आला नसल्याचे निती आयोगाने स्पष्ट केले आहे. सध्या तरी जास्तीत जास्त लसीकरणावर सरकारचा भर आहे. तसेच बूस्टर डोसबाबत तज्ज्ञ समितीने अद्याप प्रस्ताव किंवा शिफारस केलेली नाही, असेही आयोगाने म्हटले आहे. बूस्टर डोस कधी द्यायचा, याबाबत शास्त्रीय माहितीच्या आधारे संशोधन सुरू आहे. वेगवेगळ्या लशींचा प्रभाव वेगवेगळ्या कालावधीसाठी टिकू शकतो, त्याबाबत संशोधन सुरू आहे, असे व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही अद्याप बूस्टर डोसबाबत शिफारस केलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या महिन्यात, नीती आयोगाचे सदस्य डॉ व्ही के पॉल V.K. Paul यांनी केंद्र सरकारला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत काही सूचना दिल्या होत्या, ज्यामध्ये म्हटले होते की तिसऱ्या लाटेदरम्यान 100 पैकी 23 कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागेल. यासह, सरकारला 2 लाख आयसीयू बेडची तरतूद करण्याचे सुचवले गेले, ज्यात व्हेंटिलेटरसह 1.2 लाख आयसीयू बेड, 7 लाख नॉन आयसीयू बेड (यात ऑक्सिजन क्षमता असलेले ५ लाख बेड्स असावेत ) आणि 10 लाख कोविड केअर बेडचा समावेश आहे. ‘‘गंभीर आणि मध्यम लक्षणे असलेल्या सुमारे २० टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासेल. एका दिवसात ४ ते ५ लाख जणांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. पुढच्या महिन्यात दोन लाख आयसीयू बेड तयार ठेवले पाहिजेत. यात व्हेंटिलेटरसह १.२ लाख आयसीयू बेड, ७ लाख नॉन-आयसीयू हॉस्पिटल बेड असावेत, ’’ अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
राज्यात दिवसभरात ४१४१ नवे रुग्ण
महाराष्ट्रात रविवारी नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक होती. आज ४,१४१ नवे रुग्ण सापडले, तर ४,७८० रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ६२ लाख ३१ हजार ९९९ इतकी आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ९७ टक्के झाले आहे. राज्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या काहीशी कमी होऊन ५३ हजार १८२ झाली आहे. दरम्यान, कोरोनामुळे आज राज्यात १४५ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी सर्वाधिक ९० मृत्यू पुणे मंडळात झाले. त्यापाठोपाठ कोल्हापूर ३०, नाशिक ९, ठाणे ६, औरंगाबाद ४, लातूर ५, नागपूर मंडळात एका मृत्यूची नोंद झाली. राज्यातील मृतांचा एकूण आकडा १ लाख ३५ हजार ९६२ झाला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.