नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने देशातील अनेक राज्यांनी इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही राज्यांनी इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द केली आहे. तसेच केंद्र सरकारनेही सीबीएसई मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करून बारावीची परीक्षा पुढे ढकलली आहे. तसेच इतर परीक्षांबाबत सरकारकडून दक्षता घेतली जात आहे.
देशात ता. 18 एप्रिल रोजी नीट-पीजी या वैद्यकीयच्या प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे. पण देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. पण त्यावर न्यायालयाकडून निर्णय होण्यापूर्वीच केंद्र सरकारने महत्वाची घोषणा केली आहे.
केंद्रीय आयोग्यमंत्री डॅा. हर्ष वर्धन यांनी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती ट्विटरवरून दिली. दरम्यान, या परीक्षेबाबत करण्यात आलेल्या याचिकेमध्ये म्हटले होते की, कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या एमबीबीएस डॅाक्टरांना परीक्षा देण्यास भाग पाडणे चुकीचे आहे. हजारो लोकांचे जीव संकटात येऊ शकतात. इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या व बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचा संदर्भ याचिकेत देण्यात आला आहे.
दरम्यान, देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांत प्रवेशासाठी नीट-पीजी ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा देणारे अनेक डॅाक्टर सध्या विविध रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत आहेत. सुमारे दीड लाख डॅाक्टर एकाच दिवशी परीक्षेसाठी बाहेर पडणार होते. त्याचा आरोग्य यंत्रणेवरही ताण पडला असता. तसेच कोरोना संसर्ग वाढण्याचीही भिती होती.
दरम्यान, देशातील कोरोना रुग्णांचा दैनंदिन आकडा दीड लाखांच्या पुढे गेला आहे. त्यामध्ये एकट्या महाराष्ट्रातील सुमारे 60 हजारांहून अधिक रुग्ण आहेत. तर मागील दोन दिवसांपासून दररोज देशात एक हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत भारताने ब्राझीललाही मागे टाकले आहे. जगामध्ये भारत आता दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. जगात रोज आढळून येणाऱ्या प्रत्येकी पाच रुग्णांमध्ये एक रुग्ण भारतीय आहे. त्यामुळे भारताबरोबरच जगाचीही चिंता वाढली आहे.
Edited By Rajanand More
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.