हे तर राज्यसभेसाठी आझादांसह इतर नेत्यांनी रचलेले षडयंत्र; काँग्रेसच्या नेत्याचा आरोप
नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेतृत्वात बदल करण्यासोबत पक्ष संघटनेची फेररचना करावी, अशी मागणी करणारे पत्र 23 ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिले होते. यावरुन मोठा गदारोळ उडाला होता. 'जी-23' नेत्यांच्या गटाने काल जम्मू-काश्मीरमध्ये शांती संमेलनाचे आयोजन केले होते. त्यावरून पक्षाच्या नेत्या व माजी खासदार रंजीत रंजन यांनी गंभीर आरोप केला आहे. राज्यसभा तिकीटासाठी या नेत्यांचे हे षडयंत्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. या पार्श्वभूमीवर 'जी-23' नेत्यांच्या गटाने काल जम्मू-काश्मीरमध्ये शांती संमेलन घेतले. या संमेलनाला गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, राज्यसभा खासदार विवेक तंखा, लोकसभा खासदार मनीष तिवारी, राज बब्बर आणि हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हूडा आदी उपस्थित होते. या वेळी बोलताना सिब्बल यांच्यासह अन्य काही नेत्यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला. पक्ष दुबळा होत चालल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
जी 23 नेत्यांच्या या संमेलनावर बोलताना रंजीत रंजन म्हणाल्या, पक्षाने या जी 23 नेत्यांना खूप काही दिले आहे. तरीही काही लोक राज्यसभा तिकीटासाठी पक्षावर टीका करत आहेत. मागील 30 वर्षांत काँग्रेस दुबळी होत असल्याचे हे नेते म्हणतात. हे नेतेही त्याला जबाबदार नाहीत का? पक्षाच्या या स्थितीला केवळ गांधी परिवारावर आरोप करणे चुकीचे आहे. हेच नेते या परिस्थितीला जबाबदार आहेत. पक्षाला वाचविण्यासाठी त्यांनी काही केले नाही, असा आरोप रंजन यांनी केला आहे.
काय म्हणाले होते नेते...
संमेलनात बोलताना सिब्बल म्हणाले की, सत्य सांगायचे झाल्यास काँग्रेस पक्ष दिवसेंदिवस कमकुवत होत चालला आहे. यासाठी आम्ही येथे एकत्र जमलो आहोत. याआधीही आम्ही एकत्र आलो होतो आणि पक्षाला भक्कम केले होते. आमचा आवाज हा पक्षाच्या भल्यासाठी आहे. पक्ष पुन्हा भक्कम व्हावा, अशीच सगळ्यांची इच्छा आहे. नवीन पिढी पक्षाशी जोडली जायला हवी.आम्ही काँग्रेसचे चांगले दिवस पाहिले आहेत. आमचे जसजसे वय होत आहे तसा पक्ष दुबळा झालेला आम्हाला पाहायचा नाही.
'जी-23'मधील आणखी एका नेता म्हणाला की, मागील वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांचे उल्लंघन सध्या काँग्रेसमध्ये सुरू आहे. पक्षात अजून कोणत्याही सुधारणा अथवा बदल झालेले दिसत नाही.
Edited By Rajanand More
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.