नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंग यांचे आज नवी दिल्लीच्या आॅल इंडिया इन्स्टिट्युट आॅफ मेडिकल सायन्सेसच्या (एम्स) रुग्णालयात निधन झाले. सिंग गेले आठवडाभर एम्समध्ये कोरोनाचे उपचार घेत होते. मनरेगा योजनेचे शिल्पकार म्हणून रघुवंश प्रसाद सिंग ओळखले जातात.
सिंग हे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे खंदे समर्थक होते. राष्ट्रीय जनता दलाचे वरिष्ठ नेते असलेल्या सिंग यांनी गेल्याच आठवड्यात पक्षाचा राजीनामा देऊन राजकीय वर्तुळाला धक्का दिला होता. सिंग हे डाॅ. मनमोहनसिंग यांच्या मंत्रीमंडळात केंद्रीय मंत्री होते. वैशाली लोकसभा मतदारसंघातील त्यांचे कट्टर विरोधक रामा सिंग यांची राष्ट्रीय जनता दलाशी जवळीक वाढल्याने रघुवंश प्रसाद सिंग अस्वस्थ होते. त्यातूनच त्यांनी पक्षाच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामाही दिला होता. लालू प्रसाद यांनी त्यांची मनधरणी करण्यासाठी पत्र पाठवले होते. पण सिंग यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही.
दरम्यान, लालू प्रसाद यादव यांनी रघुवंश प्रसाद यांना ट्वीटरद्वारे श्रद्धांजली अर्पण केली आहे.
रघुवंश प्रसाद सिंग यांनी केंद्रात ग्रामविकास मंत्री असताना मनरेगा योजना सुरु केली. गेल्या दोन निवडणुकांमध्ये (२०१४ व २०१९) त्यांचा वैशाली मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर ते काही काळ राजकीय वनवासात गेले होते. या मतदारसंघाचे त्यांनी पाचवेळा प्रतिनिधित्व केले होते. राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखालील आघाडीत नितिश कुमार यांनी सहभागी व्हावे, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. त्यावरुनच त्यांचे व लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांचे खटके उडाले होते.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.