खबरदार : विजयाचा जल्लोष करणाऱ्यांवर गुन्हे अन् पोलिस निलंबित

कोरोनाच्या पार्श्भूमीवर होणारी गर्दी चिंता वाढवणारी असल्याने निवडणूक आयोगाने याची गांभीर्याने दखल घेतली आहे.
Election Commission orders to Chief Secretaries to prohibit victory celebrations
Election Commission orders to Chief Secretaries to prohibit victory celebrations

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट होऊ लागल्याने कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रस्त्यावर येत विजयी जल्लोष सुरू केला आहे. पण देशातील कोरोनाचा कहर वाढत असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच जल्लोष न करण्याचे आदेश दिले होते. पण अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांकडून गर्दी केली जात असल्याचे समोर आले आहे.

कोरोनाच्या पार्श्भूमीवर होणारी गर्दी चिंता वाढवणारी असल्याने निवडणूक आयोगाने याची गांभीर्याने दखल घेतली आहे. आयोगाने पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरीसह देशातील सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना आदेश जारी केले आहेत. त्यानुसार विजयी जल्लोष थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जल्लोष करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास सांगितले आहेत. तसेच असा जल्लोष आढळून आल्यास संबंधित भागातील पोलिस अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेशही आयोगाने दिले आहेत. 

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्याची चिन्हे दिसू लागल्याने अनेक भागात कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष सुरू केला आहे. फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी केली जात आहे. हेच चित्र तमिळनाडूमध्ये दिसत असून डीएमकेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आले आहेत. तर आसाममध्ये भाजप अन् केरळमध्ये डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. 

दक्षिणेत लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही मोदी फॅक्टर निष्प्रभ

कर्नाटक वगळता दक्षिण भारतातील इतर राज्यांमध्ये सत्ता मिळवण्यात भाजपला अद्यापही यश आलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही तमिळनाडू व केरळमध्ये जोरदार प्रचार केला होता. पण त्याचा काहीही परिणाम येथील मतदारांवर झाल्याचे दिसत नाही. मोदी फॅक्टर या निवडणुकीतही चालल्याचे दिसत नाही.

तमिळनाडूमध्ये 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत डीएमके व काँग्रेस आघाडीला 38 पैकी 37 जागा मिळाल्या होत्या. अण्णाद्रमुकला 2014 मध्ये 37 जागांवर विजय मिळाला होता. 2019 च्या निवडणुकीत अण्णाद्रमुकने भाजपशी आघाडी केली होती. त्याचाच फटका 2019 च्या निवडणुकीत बसल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत होते. भाजपशी आघाडी केल्याने मुस्लिम व ख्रिश्चन मते अण्णाद्रमुकपासून दुरावल्याचा दावा त्यांनी केला होता.

लोकसभा निवडणुकीत धडा घेतल्यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजपशी आघाडी करण्यात अनेक नेते अनुत्सुक होते. पण शशिकला यांच्या बंडाचा फटका बसू नये म्हणून भाजपशी आघाडी केल्याचे बोलले जाते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचा फायदाही पक्षाला घ्यायचा होता. त्यानुसार पंतप्रधान मोदींच्या अनेक सभा तमिळनाडूत झाल्या. पण या निवडणुकीतलही मोदी फॅक्टर चालला नाही. त्यामुळे डीएमकेने सुरूवातीच्या कलांमध्ये बहुमताचा आकडा पार केला आहे.

केरळमध्येही हीच स्थिती असून भाजपला जेमतेम दोन जागांवर आघाडी आहे. पंतप्रधान मोदी यांनी केरळमध्येही सभा घेतल्या होत्या. पण इथेही त्यांचा फारसा प्रभाव पडल्याचे दिसत नाही. मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी आवश्यक जागांवर मजबूत आघाडी घेतली आहे. 

दरम्यान, तमिळनाडूमध्ये विधानसभेच्या एकूण 234 जागा आहेत. तर बहुमतासाठी 118 हा जादुई आकडा आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार द्रमुकने बहुमताचा आकडा पार करत मोठी आघाडी घेतली आहे. द्रमुकला 130 हून अधिक जागांवर आघाडी मिळाली असून अण्णाद्रमुकला अद्याप 90 चा आकडाही गाठता आलेला नाही.

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com