बंगालमध्ये प्रचाराला येऊ नका! काँग्रेसचे शरद पवारांना पत्र 

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत काँग्रेसचा लढा हा सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाशी आहे.
 Sharad Pawar .jpg
Sharad Pawar .jpg

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांच्या बाजूने प्रचार करु नये, अशी विनंती काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे. काँग्रेसचे पश्चिम बंगालमधील नेते आणि राज्यसभा खासदार प्रदीप भट्टाचार्य यांनी तसे पत्र शरद पवार आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते तेजस्वी यादव यांना लिहले आहे. तुम्ही बंगालच्या प्रचारापासून दूर राहावे, अशी विनंती भट्टाचार्य यांनी दोन्ही नेत्यांना केली. 

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत काँग्रेसचा लढा हा सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाशी आहे. त्यामुळे तुमच्यासारखे स्टार प्रचारक तृणमूल काँग्रेसच्या व्यासपीठावर गेले तर सामान्य मतदारांच्या मनातील संभ्रम वाढेल. त्यामुळे आपण तृणमूल काँग्रेसच्या प्रचारात बॅनर्जी यांच्या बाजूने प्रचार करु नये, असे भट्टाचार्य यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे आता यावर शरद पवार व तेजस्वी यादव काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही निवडणूक कधी नव्हे इतकी अटीतटीची झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या आक्रमक प्रचारयंत्रणेचा सामना करण्यासाठी ममता बॅनर्जी यांना राष्ट्रीय स्तरावरील मोदीविरोधकांची साथ मिळण्याची गरज आहे. त्यासाठी भाजपाच्या विरोधात शरद पवार यांच्यासारख्या नेत्याचा ममता बॅनर्जी यांना प्रचारात फायदा होऊ शकतो.

महाराष्ट्रात शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी सरकारचा भाग आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाचाही समावेश आहे. त्यामुळे शरद पवार पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचा विरोधक असणाऱ्या तृणमूलच्या प्रचारास गेल्यास ही बाब काँग्रेस नेत्यांना खटकणारी आहे. 

तर दुसरीकडे तेजस्वी यादव यांच्या राजद बिहारमध्ये काँग्रेसशी युती आहे. गेल्यावर्षीची विधानसभा निवडणूकही दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली आहे. त्यामुळे तेजस्वी यादवही युतीधर्माच्या बंधनात अडकलेले आहेत.

मात्र, आगामी काळात राष्ट्रीय स्तरावरील समीकरणे जुळवायची असतील तर पश्चिम बंगालमध्ये भाजप विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. ही तिसऱ्या आघाडीची नांदी ठरू शकते. मात्र, आता काँग्रेसच्या भूमिकेमुळे यामध्ये खोडा घातला जाण्याची शक्यता निर्माण झीली आहे.

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 294 जागांसाठी आठ टप्प्यात मतदान होणार आहे. केरळ, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू या राज्यासंह 2 मे रोजी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. पश्चिम बंगालमधील ही लढाई ममता बॅनर्जी आणि भाजप या दोन्ही पक्षांसाठी महत्वाची आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com