ममतादीदींची नौटंकी? प्रत्यक्षदर्शी म्हणतात, त्या कारमध्येच होत्या अन्...

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल आपल्यावर चार-पाच जणांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे.
Controversy over attack on CM mamta banerjee in nandigram
Controversy over attack on CM mamta banerjee in nandigram

कोलकता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल आपल्यावर चार-पाच जणांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. यादरम्यान त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून पुढील दोन-तीन दिवस त्यांना रुग्णालयात थांबावे लागणार आहे. त्यावरून बंगालमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. तर काही प्रत्यक्षदर्शींनी हा हल्ला नसल्याचे म्हटले आहे. तर मते मिळविण्यासाठी त्यांनी ही नौटंकी केल्याचा आरोप काँग्रेस व भाजपने केला आहे.

पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे एकेकाळची विश्वासू सहकारी असलेले सुवेंदू अधिकारी आता त्यांच्याच विरोधात भाजपकडून नंदिग्राममध्ये मैदानात उतरले आहेत. नंदिग्राममधून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलेल्या ममतांवर हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हल्ला झाला त्यावेळी सुरक्षेसाठी पोलीस हजरच नव्हते, असा आरोप ममतांनी केला आहे. 

ममता बॅनर्जी या काल नंदिग्राममध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. ममता या मोटारीत बसत असताना त्यांच्यावर चार ते पाच जणांनी हल्ला केला. यात त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. सुरक्षारक्षकांनी ममतांना उचलून मोटारीत बसवल्याचे दिसले. या हल्ल्यात त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे.

काल रात्री नंदिग्राममध्ये मुक्काम करण्याचे ममतांचे नियोजन होते. मात्र, या हल्ल्यानंतर त्या थेट कोलकत्याकडे रवाना झाल्या. आज पूर्व मेदिनीपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विभू गोयल व जिल्हा पोलिस अधिक्षक प्रवीण प्रकाश यांनी आज ममतांवर ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्या बिरुलिया बाजार परिसरास भेट देऊन पाहणी केली. 

तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी या हल्ल्यामागे भाजपचे कार्यकर्ते असल्याचे म्हटले आहे. तर भाजप व काँग्रेसने मते मिळविण्यासाठी ममता बॅनर्जी हल्ला झाल्याचे नाटक करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच काही प्रत्यक्षदर्शींनीही हा हल्ला नसल्याचा दावा केला आहे. 

सुमन मेट्टी हा विद्यार्थी म्हणाला की, ''मुख्यमंत्री इथे आल्या तेव्हा त्यांच्याभोवती अनेक लोक जमले. त्यांची कार हळु-हळु पुढे जात होती. त्याचवेळी त्यांच्या मानेला आणि पायाला दुखापत झाली. त्यांना कुणीही धक्का दिला नाही.'' दुसरे प्रत्यक्षदर्शी चित्तरंजन दास यांनीही कुणीही मुख्यमंत्र्यांना धक्का दिला नसल्याचे म्हटले आहे. त्या कारमध्येच बसल्या होत्या. त्यावेळी दरवाजा उघडा होता. दरवाजा एका पोस्टरला धडकून बंद झाला. त्यावेळी त्यांच्याजवळ कुणीही नव्हते, असा दावा दास यांनी केला आहे. 

काँग्रेसचे खासदार अधिर रंजन चौधरी यांनीही हे नाटक असल्याचा आरोप केला आहे. मते मिळविण्यासाठी त्यांनी हा आरोप केला आहे. त्यांच्याजवळ पोलिस नसणे, हे हास्यास्पद आहे, असे चौधरी म्हणाले. भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी या घटनेचे राजकारण करू नये, असे म्हटले आहे. भाजपने प्रत्यक्षदर्शींचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणीही केली आहे. 

दरम्यान, ममतांनी नंदिग्राममधून लढण्याची तयारी मागील काही दिवसांपासूनच सुरू केली होती. त्यांनी अधिकृतपणे घोषणा करत त्यावर शिक्कामोर्तब केले. नंदिग्राम हा तृणमूल सोडून भाजपमध्ये गेलेले सुवेंदू अधिकारी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. नंदिग्रामवर अधिकारी कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. कधीकाळी तृणमूल काँग्रेसचे निष्ठावंत अशी त्यांची ओळख होती पण सुवेंदू यांनी बंडाचा झेंडा रोवत भाजपशी हातमिळवणी केली आहे. त्यानंतर येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. आता नंदिग्राम हा मतदारसंघ तृणमूल व भाजपच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा ठरणार आहे. दोन्ही नेते मातब्बर असल्याने विजयासाठी जोरदार प्रयत्न केले जातील.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com