"टेलीमेडिसीन" ठरली 'संजीवनी'..रुटीन हेल्थ केअरकडे पुन्हा वळा..: लेफ्टनंट जनरल कानिटकर

टेलीमेडिसीन योजनांचा वेगवान प्रसार करणे ही काळाची गरज आहे,
Sarkarnaa Banner (32).jpg
Sarkarnaa Banner (32).jpg

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या दुसऱया लाटेच्या प्रलयाचा धडा घेऊन दूरसंचार तंत्रज्ञानाद्वारे आरोग्य सुविधा ग्रामीण-दुर्गम भागांपर्यंत सर्वदूर पोहोचविणे आणि ई संजीवनी सारख्या टेलीमेडिसीन योजनांचा वेगवान प्रसार करणे ही काळाची गरज आहे, असे सैन्यदलांच्या कोरोना विशेष कृती गटाचे नेतृत्व करणाऱ्या लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी  'सरकारनामा'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.Telemedicine scheme needed Lt Gen Madhuri Kanitkar

महामारीच्या काळात लक्षणीय योगदान देणारी देशाची तिन्ही सैन्य दले आता लसीकरणाच्या राष्ट्रीय कार्यक्रमातही सक्रिय सहभाग देणार आहे. विशेषतः दुर्गम आणि ग्रामीण भागामध्ये वेगाने लसीकरण करण्यासाठी एक विशेष योजना आखण्यात आली आहे , असे त्यांनी सांगितले. दुसऱ्या लाटेच्या काळात लष्कराने उभारलेल्या विशेष कोरोना उपचार व्यवस्थेत सुमारे 15 ते 20 दिवसांत किमान 35 हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले, अशीही माहिती त्यांनी दिली. देशाची पायाभूत आरोग्य यंत्रणा आपल्याला ग्रामीण भागापर्यंत आणखी मजबूत करावी लागेल, असेही त्या म्हणाल्या.  

-  सैन्यदलांची मदत घेण्याची सुरवात कशी झाली
डाँ. कानिटकर  :  महामारीची दुसरी लाट मार्चच्या अखेरीस आली, त्यावेळी केंद्र सरकारने लष्करी दलांना सांगितले की तुम्ही अहमदाबाद तसेच दिल्लीच्या नागरी रुग्णालयांमधील कोविड उपचारांची जबाबदारी घ्या. लष्कराकडे ही वैद्यकीय मनुष्यबळ निश्‍चितपणे कमी होते. त्यामुळे लष्कर, हवाई दल आणि नौदल या एक तीनही सैन्यदलांचा मिळून एका कृती गटाची स्थापना करावी आणि कोरोना उपचारांमध्ये मदत घ्यावी, असे संरक्षण मंत्रालयाने ठरविले. सहकार्य, समन्वय आणि सातत्य या त्रिसूत्रीने कोरोनावर मात मिळवण्यासाठीची योजना आखून त्याप्रमाणे कृती गट निर्माण केला गेला.  या कोविड स्पेशल सेल चे नेतृत्व माझ्याकडे देण्यात आलं. तिन्ही सैन्य प्रमुखांनीही या संपूर्ण काळात मला कायम कार्याची भूमिका घेतली.

-काम करतानाचे अनुभव काय..
डाँ. कानिटकर  : सुरुवातीला मी तिन्ही सैन्य दलातील वैद्यकीय विभागात बरोबरच समन्वय साधला. मात्र जेव्हा रुग्णसंख्या प्रमाणाबाहेर वाढू लागली तेव्हा लष्कराचे डॉक्टर आणि वैद्यकीय बळही कमी पडणार हे स्पष्ट दिसू लागले. त्यानंतर मी वैद्यकीय सेवेत नसलेल्या लष्कर नौदल आणि हवाई दलाच्या जवानांचे कार्य घेण्याचा निर्णय केला. प्रत्येक रुग्णालयासाठी असे सुमारे 40 40 सहाय्यक डॉक्टर आणि परिचारिकांच्या मदतीला द्यावेत, असे ठरले. या जवानांना बॅटल फिल्ड नर्सिंग ट्रेनिंगचा तीन दिवसांचा छोटा कोर्स तातडीने करवून घेण्यात आला. रुग्णांना आणि नातेवाइकांना धीर देणे, ऑक्सिजन आणि औषधे यांची रुग्णालयातील चेन सप्लाय खंडित होणार नाही, याकडे लक्ष देणे, प्रसंगी रुग्णांचा रक्तदाब पहाणे आणि प्रथमोपचार करणे यासारखी कामे त्यांना दिली. लष्कराच्या दंतरोगतज्ज्ञ  तसेच प्रसुती डाँक्टरांनी आम्ही मदतीला घेतले. लष्कराचे देशभरातील किमान 1500 डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी या मोहिमेत सक्रिय सहभागी झाले. देशभरातील दीडशे रुग्णालये आणि डीआरडीओंनी उभारलेली कोरोना रूग्णालये या सर्वात मिळून एप्रिलच्या 15 ते 20 दिवसांमध्ये 34 ते 35 हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले.
 
- ई संजीवनी सारख्या उपक्रमांबाबत काय सांगाल.? 
डाँ. कानिटकर  : कोरोना सारख्या महाभयानक साथीच्या वेळेला डॉक्टर सर्वत्र पोहोचू शकतच नाहीत हा अनुभव पाहता आरोग्य क्षेत्रात यापुढे डिजीटल तंत्रज्ञान वापरणे अपरिहार्य आहे. भारतीय मेडिकल कौन्सिलने हेल्थ मिशन अंतर्गत टेली कन्सल्टेशन ही आरोग्य सुविधा सुरु करण्याचे काम मागील डिसेंबरपासून सुरू केले होते. महामारीची लाट आल्यानंतर त्याचे दिशानिर्देश एका रात्रीत आम्ही तयार केले. व ई संजीवनी योजना वेगाने सुरू झाली. कारण या काळात राज्यांमधील डॉक्टरही कोरोना उपचारांमध्ये अडकून पडले होते. आरोग्य मंत्रालयाची इ संजीवनी आणि मी सुरू केलेली लष्कराची सेहद या दोन्ही योजनांद्वारे दूरसंचार प्रणालीद्वारे उपचार करण्यासाठी आम्ही  निवृत्त लष्करी डॉक्टरांचीही मदत घेतली आणि त्यांनीही भरभरून प्रतिसाद दिला. अवघ्या एका आठवड्यांपेक्षा कमी काळात त्यांच्या सहाय्याने आरोग्य मंत्रालयाच्या ई संजीवनी पोर्टलवर जास्त डिफेन्स ओपीडी आम्ही सुरू करू शकलो. जेमतेम एका महिन्यात ई संजीवनी प्रणालीद्वारे किमान चौदा हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. एका अभ्यासानुसार अगदी छोट्या छोट्या आजारांसाठी लोक शहरातील डॉक्टरकडे जातात किंवा वैद्यकीय सल्ल्यासाठी जातात. टेलीमेडिसीन आरोग्य यंत्रणेद्वारे अशा रुग्णांवर विचार करणे आणि सल्ला देणे सहज शक्य आहे. अनेक वेळा अनुभव असा असतो की डॉक्टरांच्या एका शब्दानेही रुग्णाला निम्मे बरे झाल्याची भावना निर्माण होते आणि देशाच्या आरोग्य क्षेत्राला आता व्यापक डिजीटलीकरणाची गरजच आहे. आरोग्य क्षेत्रातही दूरसंचार तंत्रज्ञान आवश्यक आहे. सैन्यदलांची मनुष्यहानी कमी सैन्यदलाच्या 98 टक्के जवानांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. या दुसऱ्या लाटेत सैन्यदलाची मनुष्यहानी तुलनेने फार कमी म्हणजे तिनही सैन्य दलातील मिळून 30 जणांचा मृत्यू झाला. लसीकरण झालेले केवळ सहा जवान मृत्युमुखी पडले.

- या काळात काही भावनिक अनुभव आले का
डाँ. कानिटकर  :  या काळात आमचीही अवस्था रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशी होती. या काळात लष्करी रुग्णालयांमधील कोरोना रुग्णाला रुग्णांकडून अनेक भावनिक प्रतिक्रिया आम्हाला ऐकायला मिळाल्या, लष्कराचे अनेक डॉक्‍टर परिचारिका आणि आरोग्य सेवक 24- 24 तास रुग्णांवर उपचार करत होते. अनेकांनी सहा, सहा आठवडे एका दिवसाची सुट्टी न घेता काम केले. एखाद्या रुग्णालयात एकाच दिवशी तीस मृत्यू होतो तेव्हा आमचे जुनियर डॉक्टर आणि परिचारिका ही घाबरायचा. मात्र जे रुग्ण बरे होऊन घरी जायचे त्यांचे नातेवाईक डॉक्टरांच्या पायावर डोकं ठेवायचे सद्गदित व्हायचे असेही अनुभव आले.

-आरोग्य व्यवस्था कशी आहे...
डाँ. कानिटकर  : महामारीची ही लाट वैश्विक होती. त्यातून प्रगत देश ही सुटले नाहीत. ही लाट नव्हती तर सुनामी होती. आरोग्य यंत्रणा अद्ययावत आहे अशा अमेरिका ब्रिटन युरोपीय देशांचेही पाय लटपटत होते. भारतासारख्या देशांमध्ये 3-3 लाख क्षमतेची रुग्णालये काही दिवसात उभारणे हे शक्यच नाही. मात्र, यातून धडा घेऊन यापुढे आपल्याला पायाभूत आरोग्य यंत्रणा मजबूत करावी लागेल. प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालये, सामाजिक आरोग्य केंद्रे यांचे जाळे भक्कम करावे लागेल. प्रत्येक जिल्ह्यात किमान दहा दहा वेंटीलेटर बेड असलेली अतिदक्षता वार्ड उभारण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागात डॉक्टर आधी की अद्ययावत वैद्यकीय सुविधा आधी या चक्रातून सुटका यामुळे होईल. तसे झाले तर ग्रामीण भागातील नागरिकांना वेळोवेळी प्रथम उपचारांसाठी शहरांकडे यावे लागणार नाही. एक हब अंड स्पोक मॅाडेल ज्याला म्हणतात ते आपल्याला उभारावा लागेल. त्याचप्रमाणे देशभरातील वैद्यकीय महाविद्यालये जिल्हा आणि ग्रामीण रुग्णालय यांच्याशी जोडून टेलीमेडिसीन प्रणालीचे जाळे भक्कम करावे लागेल. मेडिकल कौन्सिलने वैद्यकीय पदव्युत्तर डॉक्टरांसाठी तीन-चार महिने प्रत्येक जिल्ह्यात काम केलेच पाहिजे, असा नियम नुकताच केला आहे. कोरोनाची दुसरी लाट ग्रामीण भागापर्यंत पोहोचली होती हे लक्षात घेता केवळ साधने नव्हे तर माणसेही उभी करावी लागतील.

 - लसीकरण मोहीम मंदावली आहे का..
डाँ. कानिटकर  :  भारताने अगदी अल्प काळामध्ये एक नव्हे तर दोन दोन लसी विकसित आणि उत्पादित केले आहेत. या लसीच्या चाचण्या सुरू होत्या. त्या टप्प्यामध्ये लोकांनी लसी  घेण्यासाठी उदासीनता दाखवली, आता मात्र लसीकरणाला वेग येत आहे जर जीव वाचवायचा असेल तर कोरोना लसीकरण हाच एकमेव मार्ग आहे, हे खात्रीशीरपणे पटवून द्यावे लागेल आणि त्यासाठी जनजागृतीची व्यापक मोहीम वाढवावी लागेल.  सध्याच्या दोन लसींच्या जोडीलाच जॉन्सन अँड जॉन्सन बायो याही लसी भारतात उत्पादन होण्याच्या टप्प्यावर आहेत. लसीकरणाचा राष्ट्रीय कार्यक्रम गावोगावी पोहोचवण्यासाठी लस उत्पादनाचा वेग आता लवकरच वाढणार आहे.

- मुलांना जास्त धोका असल्याची शक्‍यता आहे का..   
डाँ. कानिटकर  :   हा विषाणू आहे आणि तो संक्रमक असण्याबरोबरच आपले रंगरूप वेळोवेळी बदलणारा आहे. देशातील प्रत्येकाचे संपूर्ण लसीकरण होत नाही तोवर कोरोना गेला असे कोणी म्हणू शकत नाही. बरे झालेल्या कोरोना रुग्णांनाही सहा महिन्यानंतर पुन्हा संक्रमण झाल्याचे आढळत आहे. मात्र, लहान मुलांमध्ये याचा जास्त फैलाव होईल वाटण्यासारखे कोणतेही अभ्यास जागतिक पातळीवर समोर आलेले नाहीत. कोरोनाचा विषाणू मुलांना शोधून शोधून त्यांच्यावर हल्ला करतो असे दिसलेले नाही अठरा वर्षांपुढील मुलांचे लसीकरण सुरू आहे. मात्र, अठरा वर्षाच्या खालील लोकसंख्येचा हि विचार व्हायला हवा. 95 टक्के मुलांना असे इन्फेक्शन होऊन त्यांच्यात प्रतिकारक्षमता निर्माण होते असे जागतिक पातळीवरील अहवाल सांगतात. मात्र, आम्ही यापुढे मुलांना मास्क लावण्याची सवय लावणे गर्दीच्या ठिकाणी त्यांना न येणे, याकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. पालकांबरोबर शाळाही या बाबतीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
लसीकरण वेगाने व मोठ्या प्रमाणावर झाले हा भक्कम झाल्या आणि मुख्य म्हणजे लोकांनी आरोग्य नियम पाळले, मास्क वापरणे अनावश्यक गर्दी न करणे हे कटाक्षाने पालन केले तर तिसरी लाट आली तरी तिची संहारकर्ता आत्ताच्या एवढी नसेल हे निश्चितपणे सांगता येते.

 -  सैन्यदलांना कोरोना उपचारांकडे वळविणे कितपत योग्य आहे..
डाँ. कानिटकर  :  पंतप्रधानांनी म्हटल्याप्रमाणे कोरोनाबरोबर देशाचे युद्ध सुरू होते आणि कोणतेही युद्ध म्हटले की त्यात लष्कराचा सहभाग अपरिहार्य असतो. देशातील आरोग्य यंत्रणांवरील दुसऱ्या लाटेच्या काळातील ताण  हलका करण्यासाठी लष्कराने मदतीचा हात देऊ केला. हे करत असताना उत्तर व ईशान्य सीमेवरील लष्करी रुग्णालयांमधील एकही कर्मचारी आम्ही हलविला नाही. चीन व पाकिस्तान सीमांवर आमचे सैन्यदल आजही डोळ्यात तेल घालून सज्ज आहे.

- महामारी व्यवस्थापनाची पुढील दिशा कशी असावी 
डाँ. कानिटकर  :  कोरोनामुळे कर्करोग डिप्थीरिया हृदयरोग या रोगांवरील उपचारांकडे दुर्लक्ष झाले आहे. आपल्याला या रुटीन हेल्थ केअरकडे पुन्हा वळावे लागेल. कोरोनाला नोव्हेल विषाणू असे म्हणतात. तो प्रयोगशाळेत तयार झाला का प्राण्यांकडून पसरला हे यावरचे संशोधन सुरू आहे. लोकांना रोजगार मिळवणे तेवढेच आवश्यक आहे. विशिष्ट ठिकाणी रुग्णवाढ होताना दिसली की तो भाग कंटेनमेंट झोन करणे  म्हणजे बंदिस्त करून तातडीने उपचार सुरू करणे आणि इतर भागातील व्यवहार पूर्ववत ठेवणे हा अनेक राज्यांनी अंमलात आणलेला उपाय योग्य आहे, असे मला वाटते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com