नवी दिल्ली : चीनच्या मुद्द्यावर चर्चेला कोणी घाबरत नाही. आगामी संसद अधिवेशनातच 1962 पासून भारत चीन संबंधांवर दोन-दोन हात होऊन जाऊ द्या, असे जाहीर आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज काँग्रेसला दिले. राहुल गांधी यांच्या एकेका ट्विटमुळे चीन आणि पाकिस्तानात आनंद साजरा होतो, अशीही टीकाही त्यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत कोरोना आणि चीन संघर्ष या दोन्ही लढाया जिंकणार आहे. भाजपमध्ये नव्हे तर काँग्रेसमध्येच लोकशाही संपली आहे, असा टोलाही शहा यांनी आज एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना लगावला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गल्वान चकमकीबाबत 21 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर 'सरेंडर मोदी' अशी शाब्दिक कोटी करून टीका केली होती. त्यात त्यांनी सरेंडर शब्दाचे स्पेलिंग चुकवले होते. पंतप्रधानांवर या भाषेत झालेल्या टीकेवर शहा यांनी सांगितले की, या संकट काळात देशाचे सरकार ठाम भूमिका घेऊन उभे आहे. सैन्यदलांचे मनोधैर्य कमी होईल असे वागणे बेजबाबदारपणाचे आहे. इतक्या मोठ्या पक्षाचा माजी अध्यक्ष देशहिताच्या मुद्द्यावर देशातील सरकारच्याच विरोधात इतक्या घाणेरड्या आणि खालच्या पातळीवरचे राजकारण करतो हे वेदनादायी आहे.
काँग्रेसमध्ये लोकशाही संपलेली आहे असे सांगून शहा म्हणाले की, लोकशाही शब्दाचा अर्थ व्यापक आहे. त्यात शिस्त आणि स्वातंत्र्यही असते. भाजपमध्ये लालकृष्ण अडवानी, राजनाथसिंह, नितीन गडकरी, पुन्हा राजनाथसिंह, मी आणि आता जे. पी. नड्डा सगळे पक्षाध्यक्ष एकाच घराण्यातले आहेत का? इंदिरा गांधींनंतर गांधी घराण्याबाहेरचा कोणता अध्यक्ष झाला हे त्यांनी सांगावे. हे लोकशाही बद्दल काय बोलणार ? राहुल यांची ट्विट चीन आणि पाकिस्तानमध्ये हॅशटॅग करून चालवली जातात.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.