rajnath singh says chinese troops have moved in ladakh
rajnath singh says chinese troops have moved in ladakh

लडाखमध्ये चीनची घुसखोरी; संरक्षण मंत्र्यांचीच कबुली

लडाखमध्ये भारतीय आणि चिनी सैन्य आमनेसामने आल्यानेगेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. लडाखमध्ये चीनने घुसखोरी केल्याची कबुली सरकारने आता दिली आहे.

नवी दिल्ली : भारतीय हद्दीत चीनचे सैनिक आहेत की नाहीत, असा प्रश्न काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी सरकारला विचारला होता. यावर आता सरकारने उत्तर दिले आहे. पूर्व लडाख भागात मोठ्या संख्येने चिनी सैन्याने घुसखोरी केली आहे, अशी कबुली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज दिली. सरकारडून ही परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. चिनी सैन्याने लडाखमध्ये घुसखोरी केल्याचे सरकारने प्रथमच मान्य केले आहे. 

भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे चर्चेला उधाण आले होते. भारतीय हद्दीत सध्या चीनचा एकही सैनिक नसल्याचे सरकारने दाखवून द्यावे, असे आव्हान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी मोदी सरकारला दिले होते. लडाखमधील गलवान खोऱ्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनच्या सैन्यादरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. 

यामुळे राजनाथ सिंह यांनी सरकारच्या वतीने यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांदरम्यान 6 जूनला बैठक होणार आहे. या बैठकीत लडाखमधील परिस्थितीवर चर्चा होणार आहे. हा भाग आपला असल्याचा चीनने दावा केला आहे. त्यामुळे चीनच्या सैनिकांनी मोठ्या संख्येने तेथे घुसखोरी केली आहे. याबाबत भारताने आवश्यक ती पावले उचलली आहेत. 

चीनसोबतच्या वादाबाबत केंद्र सरकारने प्रत्यक्ष परिस्थिती जनतेला सांगावी आणि जनतेच्या मनातील शंका दूर कराव्यात, अशी मागणी काँग्रेसने गेल्या आठवड्यात केली होती. गेल्या महिन्यापासून उत्तर सिक्कीम आणि पूर्व लडाख भागांत चिनी सैन्याच्या घुसखोरीवरून दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. भारत आणि चीनमध्ये हजारो किलोमीटर लांबीची अद्याप आखणी न झालेली सीमारेषा आहे. ही प्रत्यक्ष ताबा रेषा असून, त्याच्या निश्चितीवरून दोन्ही देशांमध्ये वाद सुरू आहे. 

भारत आणि चीनने डोकलाम वाद चर्चेतून सोडविला होता. आता निर्माण झालेल्या परिस्थितीसारखी स्थिती आधीही निर्माण झाली होती आणि त्यातून मार्ग काढण्यात आला होता. यावर दोन्ही देशांमध्ये राजनैतिक आणि लष्करी पातळीवर चर्चा सुरू आहे. आम्ही कोणत्याही देशाच्या स्वायत्ततेला धक्का लावणार नाही, असे  राजनाथसिंह म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com