घोडेबाजाराच्या भीतीने गेहलोतांनी आमदार हलवले दुसरीकडे

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. यामुळे राज्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा अधिवेशन होत असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे.
rajasthan congress mlas shifted jaislmer from jaipur before assembly session
rajasthan congress mlas shifted jaislmer from jaipur before assembly session

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंड पुकारले आहे. यातच विधानसभा अधिवेशन बोलावण्याच्या मुद्द्यावरुन राज्यपाल कलराज मिश्रा आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यात जुंपली होती. अखेर राज्यपालांनी अधिवेशन बोलावण्यास होकार दिला आहे. यामुळे राज्यातील राजकीय हालचाली पुन्हा वेगवान झाल्या आहेत. 

मंत्रिमंडळाने अधिवेशन बोलावण्यासाठी पाठविलेला पहिला प्रस्ताव राज्यपालांनी फेटाळला होता. त्यानंतर मंत्रिमंडळाने दुसरा प्रस्ताव पाठविला होता. याला राज्यपालांनी उत्तर देऊन त्याविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर तिसरा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्यात आला होता. राज्यपालांनी तिसऱ्या प्रस्तावालासुद्धा नकारघंटा कायम ठेवली होती. त्या प्रस्तावातही राज्यपालांनी त्रुटी काढल्या होत्या. राज्य सरकारने तातडीने अधिवेशन बोलावण्यासाठी कोणतेही कारण दिलेले नाही. कोणतेही कारण दिलेले नसेल तर २१ दिवस पूर्वसूचना देऊन अधिवेशन बोलवता येईल, असे राज्यपालांनी म्हटले होते. 

यानंतर गेहलोत यांनी बुधवारी (ता.29) राजभवनावर जाऊन पुन्हा राज्यपालांची भेट घेतली होती. दोघांमध्ये सुमारे १५ मिनिटे चर्चा झाली. या बैठकीनंतर गेहलोत यांनी पुन्हा एकदा मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. या बैठकीत चर्चा करुन अखेर चौथ्यांदा राज्यपालांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. हा प्रस्ताव राज्यपालांनी मान्य केला. विधानसभा अधिवेशन १४ ऑगस्टपासून बोलावण्यास राज्यपालांनी मान्यता दिली आहे. याचबरोबर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अधिवेशनादरम्यान सर्व उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. 

आता विधानसभा अधिवेशन होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. गेहलोत सरकारसाठी हे कसोटीचे आहे तर पायलट यांच्यासाठी ते अस्तित्वाचे आहे. यामुळे गेहलोत हे फार खबरदारी घेत आहेत. त्यांनी आधी काँग्रेस आमदारांना जयपूरमधील हॉटेल फेअरमाँटमध्ये ठेवले होते. आज सकाळी हे आमदार जयपूर विमानतळावर नेण्यात आले. तेथून त्यांना जैसलमेरला हलविण्यात आले आहे. 

पायलट हे राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री होते. त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरोधात बंड केल्याने काँग्रेसने त्यांची प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रिपदावरुन 14 जुलैला उचलबांगडी केली होती. याचबरोबर विधानसभा अध्यक्षांनी पायलट आणि इतर १८ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे. या नोटिशीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. उच्च न्यायालयाने या प्रकरणी स्थगिती दिली आहे. याला विधानसभा अध्यक्ष सी.पी.जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील याचिका अखेर मागे घेतली होती. त्यानंतर ते पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत.  

सचिन पायलट आणि बंडखोरांमुळे राजस्थानातील कॉंग्रेसचे सरकार संकटात सापडले आहे. या सरकारपुढे बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान आहे. मागील काही दिवसांपासून या राज्यातील राजकारण चांगले तापले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. कॉंग्रेसची मोठी फौजच गेहलोत सरकार कोणत्याही परिस्थितीत वाचविण्यासाठी पुढे आली आहे. पायलट यांनी बंड केल्याने गेहलोत आक्रमक झाले आहेत. राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले तेव्हापासून मुख्यमंत्री म्हणून मी आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामध्ये कोणताही संवादच नव्हता, असा खुलासाही खुद्द गेहलोतांनीच केला होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com