नवी दिल्ली : गँगस्टर विकास दुबे हा चकमकीत ठार झाला असली तरी या चकमकीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आता विकास दुबेच्या कनेक्शनमध्ये असल्याच्या आरोपावरुन निलंबित केलेल्या पोलीस अधिकाऱ्याने जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे. त्याने या प्रकरणी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
विकास दुबे याच्याशी संबंध असल्याच्या आरोपावरुन पोलीस उपनिरीक्षक कृष्ण कुमार शर्मा यांना 5 जुलैला निलंबित करण्यात आले होते. कानपूरमध्ये दुबे याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांची माहिती शर्मा यांनी दुबेला दिल्याचा संशय आहे. या चकमकीत पोलीस उपअधिक्षकासह आठ पोलीस ठार झाले होते. या प्रकरणी चौबेपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनय कुमार तिवारी यांनाही निलंबित करण्यात आले आहे. शर्मा यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
शर्मा यांच्या वतीने त्यांची पत्नी विनिता सिरोही यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. यात म्हटले आहे की, माझ्या पतीला बेकायदा मार्गाने ठार केले जाण्याची शक्यता आहे. यामुळे त्याला संरक्षण द्यावे. या प्रकरणी स्वतंत्र संस्थेच्या माध्यमातून तपास करण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंत पोलिसांनी दुबे गँगमधील पाच जणांना चकमकीत ठार केले आहे.
या चकमकीप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी अधिकृत निवेदन जाहीर केले होते. पोलिसांच्या निवदेनानुसार, पोलिसांचे पथक विकास दुबेला घेऊन जात होता. कानपूरनजीक पोचल्यानंतर पोलिसांच्या गाडीसमोर अचानक गाई आणि म्हशींचा कळप आला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून गाडी उलटली. या अपघातामुळे गाडीतील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बेशुद्ध झाले. मात्र, विकास दुबे हा शुद्धित होता. तो पोलिसांचे पिस्तुल घेऊन पलायन केले.
पाठीमागून दुसऱ्या गाडीतून आलेल्या पोलिसांनी हे पाहिले आणि त्याचा पाठलाग सुरू केला. पोलिसांनी दुबेचा पाठलाग सुरू केला. त्यावेळी पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर दुबे हा पिस्तुलातून गोळ्या झाडू लागल्या. यामुळे पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. यात दुबे हा जखमी होऊन खाली पडला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले, असे पोलिसांनी निवेदनात म्हटले आहे.
बॉलिवूडमधील थरारक चित्रपटाप्रमाणे 10 जुलैला सकाळी झालेल्या चकमकीत विकास दुबे मारला गेला. या चकमकीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विकास दुबे आणि राजकीय नेत्यांचे असलेले संबध लपविण्यासाठीच चकमकीत विकास दुबेला मारण्यात आले, असा दावाही करण्यात येत आहे. या प्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि काँगेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य केले आहे. बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.