सुशांतच्या आयपीएस नातेवाईकाने रियावर दबाव टाकण्यास सांगितले होते; मुंबईच्या पोलीस उपायुक्तांचा गौप्यस्फोट

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर मोठे वादळ उठले आहे. या प्रकरणाच्या महाराष्ट्र विरुद्ध बिहार सरकार असा संघर्ष निर्माण झाला आहे. या प्रकरणातील गुंतागुंत दिवसेंदिवस वाढत आहे.
paramjitsingh dahiya said sushants ips relative aksed me to  pressurise rhea
paramjitsingh dahiya said sushants ips relative aksed me to pressurise rhea

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये मोठे वादळ उठले आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध सुशांतचे पिता के.के. सिंह यांनीच एफआयआर दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणाच्या तपासावरुन महाराष्ट्र आणि बिहार सरकारमध्ये जुंपली आहे. आता मुंबईच्या पोलीस उपायुक्तांनी या प्रकरणी मोठा गौप्यस्फोट केला आहे.  

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. यात त्यांनी रिया चक्रवर्तीसह तिच्या कुटुंबीयांवर धक्कादायक आरोप केले आहेत. हा एफआयआर दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांचे पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी जमा केलेले पुरावे आणि नोंदविलेले जबाबही बिहार पोलीस तपासत आहेत. 

सुशांतच्या आत्महत्येच्या तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बिहार पोलिसांच्या कार्यपद्धतीला महाराष्ट्र सरकारने आक्षेप घेतला आहे. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात सक्त वसुली संचालनालयानेही (ईडी) उडी घेतली आहे. सुशांतची आत्महत्या, आर्थिक अनियमतिताप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. 

मुंबईचे पोलीस उपायुक्त परमजितसिंह दहिया यांनी सुशांतच्या बहिणाचे पती आयपीएस अधिकारी ओ.पी.सिंह यांच्याबद्दल गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ओ.पी.सिंह यांनी रिया चक्रवर्ती हिच्यावर दबाव टाकण्यास मला सांगितले होते. तिने सुशांतला सोडून द्यावे यासाठी त्यांनी हे करण्यास सांगितले होते. त्यांनी हे फेब्रुवारी महिन्यात सांगितले होते. रियाला पोलीस ठाण्यात बोलावून धमकवावे, असे त्यांनी म्हटले होते. सुशांतवर रियाचे नियंत्रण असल्याचा त्याच्या कुटुंबीयांचा दावा होता. रियाला अशा प्रकारे बेकायदा बोलावून धमकावण्यास मी नकार दिला होता. तसेच, त्यांना लेखी तक्रार करण्यासही सांगितले होते. 

सुशांतच्या कुटुंबीयांनी त्यावेळी कोणतीही लेखी तक्रार केलेली नव्हती. केवळ ओ.पी.सिंह यांनी अनौपचारिक विनंती केली होती. यासाठी 18 ते 25 फेब्रुवारी दरम्यान व्हॉट्सअॅप मेसेज करण्यात आले होते, असेही दहिया यांनी स्पष्ट केले. 

सुशांत याने 14 जूनला मुंबईतील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याने आत्महत्येचे पाऊल नेमके कशामुळे उचलले याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. त्याच्या आत्महत्येमागे नैराश्याचे अथवा व्यावसायिक शत्रुत्वाचे कारण होते का, याचाही शोध मुंबई पोलीस घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 56 जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com