नवी दिल्ली : संसदेपासून काही पावलांच्या अंतरावर असलेल्या भारतीय रेल्वेच्या मुख्यालयात म्हणजे रेल्वे भवनात नव्याने तब्बल १०० हून जास्त अधिकारी कर्मचारी एकाच वेळी कोरोना संक्रमित आढळल्याने ही संपूर्ण इमारत काल दुपारी पुन्हा सील करण्यात आली आहे. यामुळे रायसीना, रफी, मौलाना आझाद, जनपथ व डॉ. राजेद्र प्रसाद आदी रस्त्यांसह मंत्रालयांच्या परिसरात घबराट उडाली आहे. लॉकडाऊनपासून आतापावेतो किमान चार वेळा रेल्वे भवन सील करून पुन्हा सॅनिटायजेशन करण्यात आले आहे. दरम्यान देशात रोज आढळणाऱ्या नव्या रूग्णसंख्येत शनिवारी किंचित घट झाली.
रेल्वे भवनात रोज हजारो लोकांची वर्दळ असते. स्टेट बॅंक, दिल्ली दुग्ध योजना व इतरही संस्थांची कार्यालये याच इमारतीत आहेत. रेल्वे भवनाच्या पाच मजल्यांवर हजारो कर्मचारी काम करतात. याशिवाय अभ्यागत, सुरक्षा कर्मचारी हेही येत जात असतात. रेल्वे भवन परिसरात सध्या 131 जण कोरोना संक्रमित आढळले असून सध्या १२७ कर्मचारी-अधिकारी संक्रमित झाल्याने घरीच विलीगीकरणात किंवा रूग्णालयांत आहेत, असे रेल्वे सूत्रांनी सांगितले. ऐन लॉकडाऊनमध्ये म्हणजे एप्रिलमध्ये रेल्वे भवनातील दोन अधिकारी कोरोनाग्रस्त आढळल्याने ही इमारत पहिल्यांदा सील करण्यात आली.
त्यानंतर जून, जुलै व ऑगस्टमध्येही अशीच परिस्थिती उद्भवली. मात्र रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार आता संक्रमित आढळलेल्यांचा आकडा कोणत्याही मंत्रालयापेक्षा जास्त व अतिशय भितीदायक आहे. खुद्द रेल्वे राज्यमंत्र्यांचा (सुरेश अंगडी) कोरोनाने मृत्यू झाला आहे. ल्यूटियन्स दिल्लीच्या एकाच मंत्रालयातील शंभर लोक कोरोनाग्रस्त आढळणे हे अतिशय चिंताजनक आहे. इतक्या मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्त एकाच इमारतीत असणे हे रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ पातळीपासून सामान्य कर्मचाऱ्यापर्यंत साऱ्यांच्याच जिवाला धोका पोहचविणारे ठरू शकते. त्यामुळे आता रेल्वेभवन पुन्हा सील करण्यात आले आहे. यापूर्वी तीनदा सॅनिटायजेशन केल्यावरही रेल्वे भवनात कोरोना विषाणू पुन्हापुन्हा शिरकाव कसा करतो? या प्रश्नावर रेल्वे अधिकाऱ्यांकडे उत्तर नाही. आम्हाला पुढील किमान आठवडाभर वर्क फ्रॉम होम करावे लागणआर असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.
देशाची परिस्थिती पाहिल्यास शनिवारी ४१,३२२ नवे रूग्ण आढळले व आणखी ४८५ लोकांचा मृत्यू झाला. भारतात फक्त रूग्णालयांत दाखल केलेल्या संक्रमितांचा आकडा ९३ लाख ५१ हजार ११० झाला आहे. दिल्लीसारख्या राज्यांनी घरीच विलीगीकरणाची मुभा दिली तेथील कोरोनाग्रस्तांची नेमकी संख्या सांगता येत नाही अशी स्थिती आहे. देशभरातील ८७,५९,९६९ लोकांनी कोरोनाला हरविले असून १ लाख ४४, २८५ वर पोहोचली असून कोरोनाबळींची संख्या १ लाख ३६ हजार २०० झाली आहे.
Edited By- Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.