मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कायदा कळत नाही; विकाससिंह यांची टीका

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये मोठे वादळ उठले होते. आता या प्रकरणाच्या तपासावरुन महाराष्ट्र आणि बिहार ही राज्ये आमनेसामने आले आहेत.
lawyer of sushant singh rajputs family slams chief minister uddhav thackeray
lawyer of sushant singh rajputs family slams chief minister uddhav thackeray

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये मोठे वादळ उठले आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध सुशांतचे पिता के.के. सिंह यांनीच एफआयआर दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणाच्या तपासावरून महाराष्ट्र विरुद्ध बिहार जुंपली आहे. यातच सुशांतच्या वडिलांचे वकील विकाससिंह यांनी आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. 

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. यात त्यांनी रिया चक्रवर्तीसह तिच्या कुटुंबीयांवर धक्कादायक आरोप केले आहेत. हा एफआयआर दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांचे पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी जमा केलेले पुरावे आणि नोंदविलेले जबाबही बिहार पोलीस तपासत आहेत. 

सुशांतच्या आत्महत्येच्या तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बिहार पोलिसांच्या कार्यपद्धतीला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आक्षेप घेतला होता. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात ईडीनेही उडी घेतली आहे. सुशांतची आत्महत्या, आर्थिक अनियमतिताप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. 

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी कोणाकडे पुरावे असल्यास त्यांनी समोर यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. याचा समाचार सुशांतच्या वडिलांचे वकील विकाससिंह यांनी घेतला आहे. सिंह हे माजी अतिरिक्त सॉलीसिटर जनरल आहेत. त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कायदा कळत नाही. हा फौजदारी गुन्हा आहे. यात तक्रारदाराला नव्हे तर सरकारी पक्षाला गुन्हा सिद्ध करावा लागतो. दुर्दैवाने मुंबई पोलीस हे सत्याच्या जवळ अजूनही पोचलेले नाहीत. आता या प्रकरणातील सत्य बिहार पोलीसच शोधून काढतील. 

पाटण्यात दाखल झालेला एफआयआर मुंबईला वर्ग करावा, अशी याचिका रियाने सर्वोच्च न्यायालयात केली होती. यावर बिहार सरकारने काल सुशांतच्या वडिलांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, सुशांतच्या वडिलांनीही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आता महाराष्ट्र सरकारने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. 

सुशांत याने 14 जूनला मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांत याने आत्महत्येचे पाऊल नेमके कशामुळे उचलले याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. त्याच्या आत्महत्येमागे नैराश्याचे अथवा व्यावसायिक शत्रुत्वाचे कारण होते का, याचाही शोध मुंबई पोलीस घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ३९ जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com