काँग्रेसमधील ज्येष्ठ विरुद्ध तरुण वादात मनमोहनसिंग यांची कोंडी  

काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा ज्येष्ठ विरुद्ध तरुण हा वाद उफाळून आला आहे. या वादाच्या केंद्रस्थानी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आहेत. पक्षात दुफळी निर्माण झाली असून, अनेक जण याबद्दल उघड नाराजी व्यक्त करीत आहेत.
congress young leaders target ex prime minister manmohan singh
congress young leaders target ex prime minister manmohan singh

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंड पुकारले आहे. आधी मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे आणि आता राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या बंडामुळे काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते विरुद्ध तरुण फळी हा वाद पुन्हा समोर आला आहे. या वादाच्या केंद्रस्थानी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आहेत.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानातील वादामुळे पक्षात मोठी अस्वस्थता आहे. पक्षातील तरुण नेते पक्ष सोडून जात असल्याने पक्षात चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत पक्षाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत ज्येष्ठ आणि तरुण या मुद्द्यावरुन जोरदार चर्चा झाली. बैठकीत दोन गट पडले आणि काही वेळ त्यांच्यात जोरदार जुंपली. 

या बैठकीत तरुण नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारमध्ये सहभागी असलेल्या नेत्यांनी काँग्रेसच्या सातत्याने होत असलेल्या पिछेहाटीची जबाबदारी घ्यावी, असा सूर तरुण नेत्यांनी लावला. काही तरुण नेत्यांनी राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणीही लावून धरली. पक्षाच्या अध्यक्षपदासाठी दुसऱ्या कोणाच्या नावावर एकमत होणे शक्य नसल्याने ते योग्य उमेदवार असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. 

तब्बल चार तास चाललेल्या या व्हिडीओ बैठकीला मनमोहनसिंग हेही उपस्थित होते. ते या बैठकीत एकही शब्द बोलले नाहीत. काँग्रेसची वाताहत होण्यास मनमोहनसिंग हेच जबाबदार असल्याचा सूरही बैठकीत होता. या बैठकीत काही नेत्यांनी पक्षाने आत्मपरीक्षण करण्याची गरज असून, काँग्रेस जनतेपासून दुरावत चालल्याचा मुद्दा उपस्थित केला. ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट यांच्यासारख्या नेत्यांना योग्य स्थान देण्यात पक्ष चुकला, असे परखड मतही काहींनी व्यक्त केले, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

काँग्रेसमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवरुन ज्येष्ठ काँग्रेस नेते रणजित रंजन यांनी यावरुन पक्ष नेतृत्वाला नुकताच प्रश्न केला होता. ते म्हणाले होते की, जनभावनेला हात घालणारे आणि पक्षाला पूर्णपणे बदलू शकतील असे नेते हवे आहेत. हा मुद्दा ज्येष्ठ विरुद्ध तरुण नाही. आम्हाला कठोर नेतृत्वाची गरज आहे. नेता जो म्हणेल ते पक्ष कार्यकर्त्यांना ऐकावेच लागेल. यासाठीच कठोर नेतृत्वाची पक्षाला आवश्यकता आहे. पक्ष आणि संघटनात्मक पातळीवर पूर्णपणे बदल घडवणारा कठोर नेता पक्षासाठी गरजेचा आहे. आपल्याकडे जनभावनेला हात घालणारे नेतेच नाहीत. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com