नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये गल्वान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान हुतात्मा झाल्यापासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारला धारेवर धरणे सुरुच ठेवले आहे. या मुद्द्यावरुन त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वारंवार लक्ष्य केले आहे. मोदींनी त्यांची ताकदवान व्यक्तीची बनावट प्रतिमा निर्माण केली असून, आता हीच प्रतिमा देशाचा सर्वांत मोठा दुबळेपणा ठरत आहे, असा वर्मी घाव राहुल गांधींनी घातला आहे.
राहुल गांधी यांनी भाजप सरकारविरोधात ट्विटरवर आघाडी उघडली आहे. त्यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यात त्यांनी चीनसोबत गल्वान खोऱ्यात झालेल्या संघर्षाचा दाखला दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी यांनी ते ताकदवान असल्याची बनावट प्रतिमा निर्माण केली आहे. ती त्यांची ताकद असल्याचा दिखावा केला होता. आता हीच त्यांची प्रतिमा देशाचा सर्वांत मोठा दुबळेपणा ठरत आहे. मोदी हे त्यांच्या ५६ इंच छातीच्या प्रतिमेत अडकले आहेत. याचा फायदा चीन घेत आहे. ते मोदींच्या प्रतिमेवर हल्ला करीत आहेत आणि यातून भारताला दुबळे बनवत आहेत.
राहुल गांधी यांनी चीनच्या धोरणासह इतर बाबींवरही प्रकाश टाकला आहे. त्यांनी म्हटले आहे की, चीन कोणतेही पाऊल विचारपूर्वक उचलतो. त्यांनी त्यांच्या मनात जगाचा नकाशा तयार केला आहे. त्यानुसार आता ते जगाचा आकार बदलण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत. गद्वार, वन बेल्ट वन रोड या सर्व गोष्टी जगाचा आकार बदलण्याचाच भाग आहेत. आपण तयार करीत असलेल्या महामार्गामुळे चीन अस्वस्थ झाला. यावर उपाय म्हणून त्यांनी गल्वान खोऱ्यावरीव ताबा वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
राहुल गांधी यांनी काल भाजप सरकारला लक्ष्य केले होते. त्यांनी म्हटले होते की, भाजप सरकार संस्थात्मक पातळीवर सगळीकडे असत्याचा प्रसार करीत आहे. सरकारने कोविड१९ च्या चाचण्यांवर निर्बंध आणले आणि कोरोनामुळे बळी पडलेल्या नागरिकांची संख्या कमी सांगितली. सरकारने एकूण देशांतर्गत उत्पन्न म्हणजेच जीडीपीची नवी गणना पद्धती लागू केली आहे. याचबरोबर चिनी आक्रमणावर पडदा टाकण्यासाठी सरकार प्रसारमाध्यमांना धमकावत आहे. हा भ्रम लवकरच संपेल आणि देशाला याची फार मोठी किंमत मोजावी लागेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या आक्रमकतेपुढे शरणागती पत्करली, अशी बोचरी टीकाही राहुल गांधींनी काल केली होती. त्यांनी ट्विटरवर सरकारच्या चीनविषयीच्या धोरणाची चिरफाड केली होती. त्यांनी म्हटले होते की, चीनने आपली भूमी बळकावली असून, भारत सरकार हे चेंबरलीनप्रमाणे वागत आहे. अशा प्रकारच्या वागण्यामुळे चीनचे धाडस आणखी वाढेल.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.