मायावती भाजपच्या अघोषित प्रवक्त्या; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात सचिन पायलट यांना फडकावलेला बंडाच्या निशाणानंतर राज्यातील राजकीय तिढा दिवसेंदिवस वाढत आहे. आता राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री असा संघर्ष राज्यात सुरू झाला आहे. यात इतर नेतेही उतरु लागले आहेत.
congress leader priyanka gandhi targets bsp supremo mayawati
congress leader priyanka gandhi targets bsp supremo mayawati

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंड पुकारले आहे. आता विधानसभा अधिवेशन बोलावण्याच्या मुद्द्यावरुन राज्यपाल कलराज मिश्रा आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यात जुंपली आहे. आता बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती या गेहलोत यांच्याविरोधात रिंगणात उतरल्या आहेत. मायावती यांना उत्तर देण्यासाठी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधीही मैदानात आल्या आहेत.  

पायलट हे राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री होते. त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरोधात बंड केल्याने काँग्रेसने त्यांची प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रिपदावरुन उचलबांगडी केली आहे. याचबरोबर विधानसभा अध्यक्षांनी पायलट आणि इतर १८ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे. या नोटिशीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. उच्च न्यायालयाने या प्रकरणी स्थगिती दिली आहे. याला विधानसभा अध्यक्ष सी.पी.जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील याचिका अखेर मागे घेतली आहे. 


आता मायावती यांनी गेहलोत यांची कोंडी केली आहे. गेहलोत यांचे राज्यात सरकार स्थापन झाले त्यावेळी बहुजन समाज पक्षाचे सहा आमदार काँग्रेस पक्षात विलिन झाले होते. या मुद्द्यावरुन मायावती यांनी गेहलोत यांना घेरले आहे. त्यांनी म्हटले आहे की, राजस्थान विधानसभा निवडणुकीनंतर आम्ही काँग्रेसला विनाशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, गेहलोत यांनी याचा गैरफायदा घेऊन घटनाबाह्य पद्धतीने बहुजन समाज पक्षाचे आमदार काँग्रेसमध्ये विलिन केले. गेहलोत यांनी आधीही एकदा असाच प्रकार केला होता. 

बहुजन समाज पक्ष या प्रकरणी आधीच न्यायालयात दाद मागू शकला असता. याचबरोबर काँग्रेस पक्ष आणि गेहलोत यांना धडा शिकवू शकला असता. आता मात्र, आम्ही न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आता हा विषय सोडणार नाही. गरज पडल्यास आम्ही सर्वोच्च न्यायालयातही जाऊ, असे मायावती यांनी म्हटले आहे.   

बहुजन समाज पक्षाने सहा आमदारांना व्हीप काढला आहे. राज्यात बहुमत चाचणी झाल्यास भाजपला मतदान करण्यास आमदारांना सांगण्यात आले आहे. याचा समाचार आज काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी घेतला. त्या म्हणाल्या की, बहुजन समाज पक्षाने आमदारांना काढलेला व्हीप हा लोकशाही आणि राज्यघटनेची हत्या करणाऱ्यांना दिलेली क्लिनचिट आहे. भाजपच्या अघोषित प्रवक्त्यांनी हा व्हीप काढला असून, तो भाजपला पाठिंबा देण्यासाठीच काढला आहे. 

सचिन पायलट आणि बंडखोरांमुळे राजस्थानातील कॉंग्रेसचे सरकार संकटात सापडले आहे. या सरकारपुढे बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान आहे. मागील काही दिवसांपासून या राज्यातील राजकारण चांगले तापले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. कॉंग्रेसची मोठी फौजच गेहलोत सरकार कोणत्याही परिस्थितीत वाचविण्यासाठी पुढे आली आहे. पायलट यांनी बंड केल्याने गेहलोत आक्रमक झाले आहेत. राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले तेव्हापासून मुख्यमंत्री म्हणून मी आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामध्ये कोणताही संवादच नव्हता, असा खुलासाही खुद्द गेहलोतांनीच केला आहे.

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com