नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत बोलताना भारतात कोणीही घुसखोरी केलेली नाही, असा दावा केला होता. याचाच फायदा घेत चीनने गल्वान खोरे आमचेच असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी सरकारकडे याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.
दलवाई म्हणाले की, गल्वान खोरे भारताचे आहे, यात कोणतीही शंका नाही. परंतु, अमेरिका म्हणत आहे की, गल्वान खोऱ्याचा मोठा भाग चीनने ताब्यात घेतला आहे. त्यामुळे नेमकी परिस्थिती काय आहे? नेमकी परिस्थिती जनतेसमोर यायला हवी. आपले 20 जवान हुतात्मा झाले आहेत. त्यांना शस्त्र आणि दारुगोळ्याशिवाय तेथे कोणी पाठवले याची चौकशी व्हायला हवी. याचबरोबर गल्वान खोऱ्यावर चीनने मोठ्या प्रमाणात ताबा मिळविला आहे, असे अमेरिका म्हणत आहे. त्यामुळे या प्रकरणातील सत्य समोर येणे गरजेचे आहे.
देश संकटात असताना आम्ही नेहमीच सरकार आणि लष्करासोबत आहोत. चीनच्या प्रकरणातही आम्ही सरकारसोबत आहोत. प्रत्येक वेळी संकटात आम्ही सरकारसोबत उभे राहिलो आहोत. देश अडचणीत आल्यानंतर आम्ही राजकारण बाजूला ठेवले आहे. केंद्र सरकारने चीनविरोधात कठोर कारवाई करावी, असे दलवाई यांनी नमूद केले.
भारत आणि चीन यांच्या सैन्यात पूर्व लडाखमध्ये 15 जूनला रात्री झालेल्या धुमश्चक्रीत भारताते 20 जवान हुतात्मा झाले होते. एएनआय 'वृत्तसंस्थे'ने दिलेल्या माहिनुसार यात चीनचेही 43 सैनिक मारले गेले आहेत. लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गल्वान खोऱ्यात दोन्ही देशांचे हजारो सैनिक तैनात असून, ते वारंवार आमनेसामने येऊन याआधीही संघर्ष झाला आहे. दोन्ही बाजूच्या सैन्यांमध्ये मारामारीचे प्रकार घडले आहेत मात्र, अद्याप गोळीबार झालेला नाही.
भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत ठरल्याप्रमाणचे 15 जूनला चीनचे सैन्य गल्वान खोऱ्यातून माघार घेण्याच्या तयारीत होते. त्यावेळी दोन्ही देशांतील सैन्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. याचे पर्यावसान भांडणात झाले. त्यावेळी दोन्ही बाजूंच्या सैन्याने दगड आणि काठ्यांचा वापर केला. दोन्ही देशांच्या सैन्यात तुंबळ धुमश्चकी झाली. अखेर मध्यरात्रीनंतर हे सर्व शांत झाले. यात भारताच्या 20 जवान हुतात्मा झाले तर चीनचेही काही सैनिक मारले गेले. महत्वाचे म्हणजे या सर्व भांडणात दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला नाही.
भारत आणि चीन सीमेवर सुमारे 45 वर्षांच्या कालावधीनंतर अशा प्रकारची घटना घडली आहे. चीनसोबत झालेल्या संघर्षात एवढ्या वर्षांनंतर प्रथमच भारताने अधिकारी आणि जवान गमावले आहेत. या आधी अरुणाचल प्रदेशमध्ये 1975 साली टुलुंग खिंडीत सीमेवर चीनसोबत झालेल्या संघर्षात चार भारतीय जवान हुतात्मा झाले होते. भारतीय लष्कराने चीनच्या बाजूचे सैनिकही मारले गेल्याचा दावा केला आहे.
मागील पाच आठवड्यांपासून पूर्व लडाखमध्ये भारतीय सैन्य आमनेसामने आले असून, दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी गल्वान खोऱ्यात दोन्ही देशांनी संघर्ष टाळून माघार घेतल्याचा दावा नुकताच केला होता. आता ही घटना घडल्याने त्यांच्या दाव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पूर्व लडाखमध्ये पँगाँग त्सो, गल्वान खोरे, डेमचॉक आणि दौलत बेग ओल्डी या ठिकाणी दोन्ही देशांच्या सैन्यांदरम्यान याआधी संघर्ष झाला आहे. मात्र, यात कोणतीही जिवितहानी झालेली नव्हती. पँगाँग त्सो या भागात अनेक ठिकाणी भारताच्या बाजूला चीनच्या सैन्याने घुसखोरी केली आहेत. भारतीय लष्कराने याला विरोध केला असून, चीनने तातडीने सैन्य माघारी घ्यावे, अशी मागणी केली आहे. आता गल्वान खोऱ्यातील घटनेने हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.