बीजिंग : भारत आणि चीनला तिसऱ्या कोणत्याही देशाची मध्यस्थी नको आहे. सध्या सुरू असलेला वाद दोन्ही देशा मिळून सोडवतील, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झिओ लिजियान म्हणाले. दोन्ही देश चर्चेतून वाद सोडविण्यास समर्थ आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
भारत आणि चीन यांच्या सीमेशी निगडित वाद सोडविण्यासाठी आधीपासून एक कार्यपद्धती कायम आहे. दोन्ही देश एकमेकांशी संवाद साधून आणि चर्चा करुन मार्ग काढत आले आहेत. दोन्ही देश चर्चा आणि संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्यास सक्षम आहेत. त्यामुळे आम्हाला यात तिसऱ्या कोणाची मध्यस्थी नको आहे, असे लिजियान यांनी सांगितले.
भारत आणि चीन सीमेवर तणाव वाढत असल्यामुळे चीनने भारतातील आपल्या नागरिकांना परत बोलाविण्यास सुरूवात केली आहे. या परिस्थितीत दोन्ही देशांमधील तणाव निवळावा यासाठी मध्यस्थी करण्याची इच्छा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलून दाखविली होती. याचबरोबर तणाव कमी करण्यासाठी चीनने पुढाकार घेऊन, चर्चेतून मतभेद सोडविण्याची तयारी दर्शविली होती. चीनचे भारतातील राजदूत सून वेईडोंग यांनी भारत व चीन एकमेकांसाठी धोका नाहीत, असे विधान करून परस्पर सहकार्याचे आवाहन केले. मात्र, सीमेवर मोठ्या प्रमाणात तैनात केलेले सैन्य परत बोलावण्याबद्दल चीनकडून घोषणा झालेली नाही. लडाखच्या त्सांगपो सरोवराच्या परिसरात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ भारतीय हद्दीतील रस्ते बांधणीला चीनने आक्षेप घेतला आहे. यावरुन दोन्ही देशांच्या सैन्यांत संघर्षही झाला होती. भारतानेही या परिसरात सैन्य येथे तैनात केले आहे. दरम्यान, चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना चिनी सैन्याला युद्धासाठी तयार राहण्याचे आदेश दिल्यामुळे या तणावाचे रूपांतर संघर्षात होण्याची शक्यताही वर्तविण्यात आहे.
हे देखील वाचा : कोरोनामुळे राज्य गमावणार 30 लाख कोटी
मागील काही काळ भारत आणि चीनमधील सीमावाद दिवसेंदिवस चिघळत चालला असून, तीन वर्षांपूर्वीच्या डोकलाम वादानंतर उभय देशांचे सैन्य पुन्हा एकदा आमनेसामने आले आहे. चीनच्या कारवायांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने देखील पेंगोंग त्सो आणि गाल्वान खोऱ्यातील लष्करी बळ वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे याच भागांत दीड ते दोन हजार चिनी सैनिक तैनात आहेत. चीनने याच भागात लष्करासाठी सोयीसुविधा उभारल्याने भारताच्या चिंतेत भर पडली आहे.
पूर्व लडाखमध्ये 5 मे रोजी सुमारे अडीचशे भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता. दुसऱ्या दिवसांपर्यंत हा संघर्ष सुरू होता. यात दोन्ही देशांचे शंभरहून अधिक सैनिक जखमी झाले होते. त्यावेळी स्थानिक कमांडरनी बैठक घेतल्यानंतर हा संघर्ष थांबला होता. यानंतर 9 मे रोजी उत्तर सिक्कीममधील पेंगोंग त्सो येथेही असाच प्रकार घडला होता.
लडाखमधील भागावर चीन पूर्वीपासून आपला अधिकार सांगतो आहे . गाल्वान खोऱ्यावरून मात्र उभय देशांत कसलाही वाद नव्हता पण चीनने आता कारण नसताना या भागात आपले लष्कर तैनात केले असल्याची माहिती एका लष्करी अधिकाऱ्याने दिली. या आधीही सीमावर्ती भागात अशाच प्रकारची तणावाची स्थिती निर्माण झाली होती. तीन वर्षांपूर्वी डोकलाममध्ये दोन महिने दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आले होते. आता पूर्व लडाखमध्ये याचीच पुनरावृत्ती होताना दिसून येते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.