ब्रेकिंग : सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी; बिहारची मागणी केंद्राकडून मंजूर

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर मोठे वादळ उठले आहे. या प्रकरणाच्या तपासावरुन महाराष्ट्र विरुद्ध बिहार सरकार संघर्ष सुरू आहे. या प्रकरणातील गुंतागुंत दिवसेंदिवस वाढत आहे.
central government accepted bihar recommendation of cbi enquiry in sushant singh rajput case
central government accepted bihar recommendation of cbi enquiry in sushant singh rajput case

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये मोठे वादळ उठले आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध सुशांतचे पिता के.के. सिंह यांनीच एफआयआर दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणाच्या तपासावरुन महाराष्ट्र आणि बिहार सरकारमध्ये जुंपली आहे. बिहार सरकारने या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्याची केलेली मागणी आता केंद्र सरकारने मान्य केली आहे. 

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. यात त्यांनी रिया चक्रवर्तीसह तिच्या कुटुंबीयांवर धक्कादायक आरोप केले आहेत. हा एफआयआर दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांचे पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी जमा केलेले पुरावे आणि नोंदविलेले जबाबही बिहार पोलीस तपासत आहेत. 

सुशांतच्या आत्महत्येच्या तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बिहार पोलिसांच्या कार्यपद्धतीला महाराष्ट्र सरकारने आक्षेप घेतला आहे. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात सक्त वसुली संचालनालयानेही (ईडी) उडी घेतली आहे. सुशांतची आत्महत्या, आर्थिक अनियमतिताप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. 

रिया चक्रवर्ती हिने सुशांतचे पिता के.के.सिंह यांनी बिहारमध्ये दाखल केलेला एफआयआर मुंबईत वर्ग करावा, अशी मागणी याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात केली आहे. यावर आज झालेल्या सुनावणीवेळी सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्र सरकारच्या वतीने म्हणणे मांडले. बिहार सरकारने या प्रकरणी सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. केंद्र सरकारने ही शिफारस मान्य केली आहे, असे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. 

सुशांत याने 14 जूनला मुंबईतील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याने आत्महत्येचे पाऊल नेमके कशामुळे उचलले याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. त्याच्या आत्महत्येमागे नैराश्याचे अथवा व्यावसायिक शत्रुत्वाचे कारण होते का, याचाही शोध मुंबई पोलीस घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 56 जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com