राजस्थानमध्ये भाजपसाठी सर्व पर्याय खुले : प्रदेशाध्यक्ष पुनिया

राजस्थानमधील राजकीय वादळ शमण्याची चिन्हे नसून, भाजपने आता राज्यात सत्तेत राहण्याचा काँग्रेसला कोणताही अधिकार नसल्याचे म्हटले आहे.
bjp state president satish poonia says all options are open in rajasthan
bjp state president satish poonia says all options are open in rajasthan

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्यातील वाद उफाळून आला आहे. यावरुन आता भाजपने काँग्रेसला लक्ष्य केले आहे. राजस्थानमधील जनतेचा विश्वास गमावलेले सरकार जायला हवे, असे भाजपने म्हटले आहे. याचबरोबर सर्व पर्याय खुले असल्याचे भाजपने म्हटले आहे. 

राजस्थानमधील घडामोडींविषयी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतिश पुनिया म्हणाले की, राजस्थानमधील काँग्रेस सरकारने जनतेचा विश्वास गमावला आहे. हे सरकार सत्तेतून जायला हवे. आमच्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत. राज्यात निर्माण होणारी परिस्थिती आणि केंद्रीय नेतृत्वाच्या निर्देशानुसार पावले उचलली जातील. काँग्रेसमध्ये कायम तरुण नेत्यांना बाजूला केले जाते अथवा दुर्लक्ष केले जाते. काँग्रेसला बळ देण्यासाठी पाच वर्षे पायलट यांनी काम केले. त्यांना पक्षाने डावलले आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला आज सुमारे 90 आमदार हजर होते. ही बैठक गेहलोत यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीतून बाहेर पडताना पक्षाचे आमदार विजयाची खूण करीत होते. त्यामुळे गेहलोत यांनी शक्तिप्रदर्शन करुन पक्षश्रेष्ठींवर दबाव आणल्याचे चित्र आहे. या वेळी पक्षाने पाठविलेले केंद्रीय निरीक्षक रणदीप सुरजेवाला आणि अजय माकन हेही उपस्थित होते. 

या बैठकीत काही ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये राज्यातील लोकशाहीला धक्का पोचवून भाजप आठ कोटी जनतेचा अपमान करीत आहे. हे कदापी स्वीकारार्ह नाही. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांनी घेतलेले निर्णय आम्हाला मान्य असतील. राज्यातील अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार एकमताने पाठिंबा आहे.  राज्यातील काँग्रेसचे सरकार आणि पक्षाच्या विरोधात कारवाया करणारे पक्ष पदाधिकारी अथवा आमदार यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.

सचिन पायलट यांच्याशी पक्षाकडून चर्चा सुरू आहे. मागील 48 तासांत अनेक वेळा त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. राज्यातील मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर असून, ते पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असे सुरजेवाला यांनी सांगितले. 

सचिन पायलट यांच्या निकटवर्ती सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेहलोत यांनी दावा केल्याएवढे संख्याबळ त्यांच्याकडे नाही. मुख्यमंत्र्यांची परसबाग हे काही संख्याबळ सिद्ध करण्याचे ठिकाण नाही. त्यांच्याकडे संख्याबळ असेल तर त्यांनी शिरगणती का केल नाही? आमदारांना राज्यपालांकडे नेण्याऐवजी हॉटेलमध्ये का नेले? 

उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट हे काही आमदारांसह दिल्लीत पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजस्थान काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. गेहलोत यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक आज बोलाविली होती. या बैठकीला सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांनाही पाचारण करण्यात आले होते. 

पायलट यांनी उघडपणे संघर्षाची भूमिका घेतल्याने राज्य पातळीवर सर्व सूत्रे गेहलोत यांनी स्वत:च्या हाती घेतली आहेत. याचाच भाग म्हणून आमदारांची बैठक बोलाविण्यात आली होती. अनेक मंत्री आणि आमदारांनी गेहलोत यांना दूरध्वनी करुन पाठिंबा दर्शविला आहे. या बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस व राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे उपस्थित होते. 

दरम्यान, काल रात्री सचिन पायलट यांनी 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. राजस्थानमधील मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार अल्पमतात आल्याचेही त्यांनी म्हटले होते. याचबरोबर आज होणाऱ्या काँग्रेसच्या विधिमंडळ बैठकीलाही पायलट उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. 
Edited by Sanjay Jadhav    
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com