पाटणा : भारतातील जनता पाकिस्तान आणि चीनला कधीच माफ करणार नाही. त्याचप्रमाणे लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला (आरजेडी) बिहारमधील जनता कधीच माफ करणार नाही, असा टोला भाजपचे प्रवक्ते निखिल आनंद यांनी लगावला. शीखांचे शिरकाण आणि जम्मू-काश्मीर प्रश्नाबद्दल काँग्रेसला देशातील जनता माफ करणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
माझ्या आई-वडिलांची 15 वर्षे राज्यात सत्ता होती. त्यांच्या हातून काही चुका झाल्या असतील तर, या चुकांबद्दल मी तुमची माफी मागतो, अशी जाहीर माफी आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी आज मागितली. तेजस्वी यांच्या या भावनिक माफीनाम्यामुळे ते बिहारमधील जनतेच्या हृदयाला हात घालण्यात यशस्वी झाल्याचे मानले जात आहे. मात्र, यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर जनतेची दिशाभूल करीत असल्याची टीका केली आहे.
याविषयी भाजपचे प्रवक्ते निखिल आनंद म्हणाले की, आरजेडीचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची कुकर्मे त्यांनी 15 वर्षांच्या सत्ताकाळात हातून गेल्यानंतर समोर आलेली होती. त्यांनी केलेले गैरव्यवहार मोठ्या प्रमाणता समोर आलेले होते. लालूप्रसाद यादव हे सध्या चारा गैरव्यवहार प्रकरणी रांची कारागृहात आहेत. मात्र, त्यांनी अद्याप स्वत:च्या चुकांबद्दल माफी मागितलेली नाही.
आरजेडीचे नेतृत्व तेजस्वी करीत आहेत. पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून त्यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. राज्यातील मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) '15 वर्षे विरुद्ध 15 वर्षे' प्रचार सुरू केला आहे. एनडीएची राज्यात 2005 पासून सत्ता आहे. यातील चार वर्षे नितीशकुमार यांच्यासोबत आरजेडी सत्तेत होती. नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाकडून एनडीएची 15 वर्षे आणि लालू प्रसाद यादव यांच्या कार्यकाळातील 15 वर्षे यांची तुलना केली जात आहे. नितीशकुमार यांच्या काळात राज्यात विकास झाल्याचा दावा केला जात आहे.
तेजस्वी यादव यांनी आज राज्यातील बेरोजगारी आणि स्थलांतराच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री नितीशकुमार यांना लक्ष्य केले. राज्यात रोजगाराच्या संधीच नसल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक रोजीरोटीसाठी दुसऱ्या राज्यात जात आहेत. सरकारचा सुशासनाचा दावा फोल ठरला आहे. देशभरातील स्थलांतरित मजूर त्यांच्या मूळ गावी परतत आहेत. यात सर्वाधिक मजूर बिहारमध्ये परतले आहेत, असा टोलाही तेजस्वी यादव यांनी लगावला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.