पाटणा : बिहारमध्ये रस्ता रोकोसारखे आंदोलन करुन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारा व्यक्ती आता सरकारी नोकरी आणि कंत्राटाला मुकणार आहे. एखाद्या व्यक्तीविरुद्ध आरोपपत्र दाखल झाले असेल आणि त्यात त्याचे नाव असेल तर तो सरकारी नोकरीपासून वंचित राहणार आहे. दरम्यान, या आदेशावरुन तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे.
बिहारचे पोलिस महासंचालक एस.के. सिंघल यांनी आदेश काढला असून तो बिहारच्या सर्व जिल्ह्यात लागू करण्याचे निर्देश सर्व जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. आदेशानुसार, एखाद्याने कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणारी स्थिती निर्माण केली असेल, आंदोलन आणि रास्ता रोको यासारख्या घटनांत एखादा व्यक्ती सामील होत असेल आणि त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होत असेल तर त्याच्या अडचणीत वाढ होईल. म्हणजेच एफआयआरमध्ये त्याचे नाव असल्यास त्याला सरकारी नोकरी आणि कंत्राट मिळणार नाही.
तत्पूर्वी सरकारने सोशल मीडियासंदर्भात आदेश काढला होता. त्यानुसार एखाद्या सरकारी निर्णयाबाबत किंवा अन्य सरकारच्या भूमिकेबाबत तथ्यहीन आरोप केल्यास त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो, असे बिहार सरकारने म्हटले होते.
विरोधकांची नितीशकुमारांवर टीका
पोलिसांच्या आदेशानंतर विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांना ‘हिटलर’ असे म्हटले आहे. ४३ आमदारांचे मुख्यमंत्री लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. यादव म्हणाले, की भाजपकडून नितीशकुमार यांचा आवाज दाबला जात आहे आणि त्याचा राग ते बिहारच्या जनतेवर काढत आहेत.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.