#SSRSuicide : बिहार पोलिसांकडून प्रोटोकॉलचे उल्लंघन; गृहराज्यमंत्री देसाईंचा आक्षेप

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये वादळ उठले आहे. आता या प्रकरणाच्या तपासावरून मोठा गदारोळ सुरू झाला असून, महाराष्ट्र विरुद्ध बिहार सरकार आणि तपास यंत्रण असा वाद सुरू झाला आहे. या प्रकरणी नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे.
bihar police is not following protocols says maharashtras minister of state for home
bihar police is not following protocols says maharashtras minister of state for home

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये वादळ उठले आहे. सुशांतच्या आत्महत्येची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध सुशांतचे पिता के.के. सिंह यांनीच एफआयआर दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणी बिहार पोलिसांचे पथक मुंबईत तपासासाठी दाखल झाले आहे. या प्रकरणी बिहार पोलिसांच्या कार्यपद्धतीला महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आक्षेप घेतला आहे. 

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. यात त्यांनी रिया चक्रवर्तीसह तिच्या कुटुंबीयांवर धक्कादायक आरोप केले आहेत. हा एफआयआर दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांचे पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले आहे. या प्रकरणाचा तपास करणारे मुंबईचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांची पथकाने भेट घेतली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी जमा केलेले पुरावे आणि नोंदविलेले जबाबही बिहार पोलीस तपासत आहेत. 

सुशांतच्या आत्महत्येच्या तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बिहार पोलिसांच्या कार्यपद्धतीला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की, बिहार पोलीस हे प्रोटोकॉलचे उल्लंघन करीत आहेत. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पहिल्या दिवसापासून मुंबई पोलीस तपास करीत आहेत. एका राज्यातून तपासासाठी दुसऱ्या राज्यात पोलीस पथक गेल्यानंतर काही प्रोटोकॉल पाळावे लागतात. बिहार पोलीस मात्र, ते पाळताना दिसत नाहीत. 

सुशांत याने 14 जूनला मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांत याने आत्महत्येचे पाऊल नेमके कशामुळे उचलले याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. त्याच्या आत्महत्येमागे नैराश्याचे अथवा व्यावसायिक शत्रुत्वाचे कारण होते का, याचाही शोध मुंबई पोलीस घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ३९ जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे.  

सुशांतवर उपचार करणारे मानसोपचारतज्ञ डॉ.केर्सी चावडा यांचाही जबाब पोलिसांनी नोंदविला होता. सुशांतवरील वैद्यकीय उपचाराबाबत माहिती घेण्यासाठी ही चौकशी करण्यात आली होती. त्याची मानसिक स्थिती आणि औषधोपचार याचीही माहिती घेण्यात आली होती. दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) करावा, अशी मागणी रिया चक्रवर्ती हिने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली होती. मात्र, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची शक्यता फेटाळून लावली होती.

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी नुकताच ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट्ट यांचा जबाब नोंदविला आहे. याचबरोबर धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविला असून, सुशांतने धर्मा प्रॉडक्शनसोबत शेवटी केलेल्या ड्राईव्ह या चित्रपटाच्या कराराची प्रतही त्यांनी पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी यशराज फिल्म्सचे (वायआरएफ) आदित्य चोप्रा आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचीही पोलिसांनी नुकतीच चौकशी केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ३९ जणांचे जबाब नोंदविले आहेत. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा मॅरेथॉन तपास सुरू आहे. आगामी काळात आणखी काही जणांचे जबाब नोंदविण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com