धक्कादायक : राम मंदिरासाठी रथयात्रा काढणाऱ्या अडवानींनाच भूमिपूजनातून डावलले

अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणाचा मुहूर्त अखेर निघाला आहे. मात्र, राम मंदिराचे भूमिपूजन सुरु होण्याआधीच हा कार्यक्रम वादग्रस्त होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
advani and murlimanohar joshi not ivited for ram mandir bhoomi pujan
advani and murlimanohar joshi not ivited for ram mandir bhoomi pujan

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम सुरू करण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. मंदिराच्या पायाभरणी कार्यक्रमाचे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले असून, ५ ऑगस्टला हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण देशभरात रथयात्रा काढून राम मंदिराविषयी जनमत निर्माण करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांना पाठविण्यात आलेले नाही. याचबरोबर भाजपचे आणखी एक ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी यांनाही निमंत्रण पाठविण्यात आलेले नाही.  या दोन ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिराच्या भूमिपूजनाचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्सिंगचे बंधन सर्वांनाच पाळावे लागेल. यामुळे कार्यक्रमाला दोनशेपर्यंत व्यक्ती सहभागी होतील. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींची यादी अद्याप अंतिम झालेली नाही. 

या कार्यक्रमाचे निमंत्रण उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांना मिळाले आहे. त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे म्हटले आहे. याचवेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी आणि मुरलीमनोहर जोशी यांना मात्र, निमंत्रण पाठविण्यात आलेले नाही. अडवानी, जोशी आणि उमा भारती हे सर्वजण बाबरी मशिद पाडल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात आरोपी आहेत. 

राम मंदिर बांधण्यासाठी 1990 मध्ये सुरू झालेल्या चळवळीचा अडवानी हे चेहरा होते. ही चळवळ नंतर देशभरात पसरली. अखेर अयोध्येतील बाबरी मशिद पाडण्यात आली होती. बाबरी मशिद पाडण्याआधी अडवानी, जोशी, उमा भारती आणि कल्याण सिंह यांनी प्रक्षोभक भाषणे केली होती. यामुळे जमाव हिंसक होऊन त्यांनी बाबरी मशिद पाडली, असा आरोप केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केला आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान कार्यालयाकडे मंदिर निर्माण ट्रस्टने दोन तारखा पाठविल्या होत्या. यातील ५ ऑगस्ट ही तारीख पंतप्रधान कार्यालयाने अंतिम केली आहे. या तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मंदिराची पायाभरणी होईल. मोदी हे अयोध्येत सकाळी ११.३० ते दुपारी १ या वेळेत असतील. मंदिराच्या बांधकामाच्या तयारीचे काम काही दिवसांसाठी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे थांबविण्यात आले होते. आता ते पूर्ण क्षमतेने सुरू होईल. 

ट्रस्टची नुकतीच बैठक झाली होती. या बैठकीत मंदिराच्या पायाभरणीची तारीख निश्चित करण्याबाबत चर्चा झाली. यातून दोन तारख्या ठरविण्यात आल्या. मंदिराच्या पायाभरणीसाठी माती परीक्षण करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. लार्सन टुब्रो कंपनी हे काम करीत आहे. जमिनीखाली ६० मीटर खोलीवरील मातीची क्षमता तपासून मंदिराच्या पायाभरणीचे नकाशे तयार करण्यात येणार आहेत. याचबरोबर मंदिरासाठी संगमरवराचे काम सोमपुरा मार्बल ब्रिक्स कंपनीला देण्यात आले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com