माळेगाव (जि. पुणे) : केंद्रात गेली सहा वर्षे तुमचे सरकार आहे. ठीक आहे आमच्याकडून चुका झाल्या, तर त्या गेल्या सहा वर्षांत तुम्हाला दुरुस्त करता आल्या नाहीत का? असा सवाल करीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.
दिवसेंदिवस वाढत्या इंधनदराने सर्वसामान्य हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदीचे सरकार जबाबदार असून त्यावेळचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप पवार यांनी केला.
बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रूक येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या अधिपत्याखाली शनिवारी (ता. 20 फेब्रुवारी) पार पडली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले.
दररोज वाढणाऱ्या इंधन दरवाढीच्या विषयावरुन केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. यात आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही उडी घेतली आहे. केंद्रात गेली सहा वर्षांपासून सत्तेत असताना देखील चुका दुरुस्त करता येत नसतील, तर त्यावर चर्चा काय करायची? असा टोला पवार यांनी लगावला आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत इंधन दरवाढ दिल्लीत चांगलीच तापणार असल्याचे चिन्हे आहेत.
हेही वाचा : ठेकेदारांना पैसे मागणाऱ्यांना मी सोडणार नाही
माळेगाव : "अजित पवारांनी रस्त्यांसह विकास कामांना निधी द्यायचा आणि सरपंचांनी ठेकेदारांकडे पैशाची मागणी करायची, हे खपवून घेतले जाणार नाही. शेवटी जनतेच्या पैशावर जर कोणी डल्ला मारण्याचा प्रयत्न करणार असेल, तर मी त्याला सोडणार नाही. त्याला यापुढे पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल. तो कितीही जवळचा कार्यकर्ता असो अथवा नसो,'' अशा भाषेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाचखोरी करणाऱ्यांना नाव न घेता दम भरला.
बारामती तालुका सहकारी दूध संघाच्या वार्षिक सभेत एका ठेकेदाराकडून एका सरपंचांनी पैशाची मागणी केल्याची तक्रार आली होती, त्या घटनेचा समाचार अजित पवार यांनी जाहीर सभेतच घेतला.
पवार म्हणाले,"राज्याचा कारभार करीत असताना मी बारामतीला अधिकचे देण्याचा प्रयत्न करीत असतो. जिरायत भागात पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी सुमारे अडीचशे कोटी रुपयांची योजना प्रस्तावित आहे. रस्ते, दिवाबत्ती, आरोग्य, शिक्षण, सांडपाण्याच्या सुविधा पुर्णत्वाला आण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न असतो.''
"यापुढील काळातही बारामतीसाठी कोट्यवधी रुपये मंजूर करणार आहे. परंतु तालुक्यातील एका सरपंचाने रस्त्याचे काम मिळालेल्या ठेकेदाराकडे पैशाची मागणी केली व सांगितले की मी अजितदादांकडे या कामाचा पाठपुरावा केला आहे, तुम्हाला पैसे द्यावे लागतील. अर्थात मोबाईलवरचे ते बोलणे संबंधित ठेकेदाराने रेकॉर्ड केले आणि मला पाठविले. याबाबत मी जरा संयमाची भूमिका घेतली; अन्यथा पोलिसांच्याच ताब्यात देण्याचा माझा विचार होता. यापुढे अशा तक्रारी आल्या तर मी कोणाला सोडणार नाही,'' असा निर्वाणीचा इशाराच अजित पवारांनी तालुक्यातील सरपंच व इतर पदाधिकाऱ्यांना दिला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.