औरंगाबादचे नाव बदलणारच...

महाविकास आघाडी सरकार एकत्रितपणे नामांतराचा निर्णय घेईल, असे स्पष्ट करतानाच शहराचे नाव तर बदलणारच पण चेहरामोहराही बदलणार, असा ठाम विश्वास राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
Aditya Thackeray jpg
Aditya Thackeray jpg

औरंगाबाद ः महाविकास आघाडी सरकार एकत्रितपणे नामांतराचा निर्णय घेईल, असे स्पष्ट करतानाच शहराचे नाव तर बदलणारच पण चेहरामोहराही बदलणार, असा ठाम विश्वास राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.   

ठाकरे यांच्या हस्ते आज शहरातील विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आधीच पूर्ण झालेल्या कामांची नव्याने शिवसेनेकडून उद्घाटने केली जात आहेत, अशी टीका करत भाजपने आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता, ठाकरेंनी भाजपला चांगलेच सुनावले. आजच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामावर जनतेने समाधान व्यक्त करत त्यांना पसंती दर्शवली आहे. बहुतेक याची पोटदुखीच भाजपला झाली असावी,  केवळ विरोधाला विरोध करायचा म्हणून त्यांनी अशी भूमिका घेतली असावी असा, टोला राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपला लगावला. 

कचरा प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकरे यांनी शिवसेना सातत्याने शहराच्या विकासासाठी झटत असल्याचा उल्लेख केला. सुभाष देसाई व त्यांच्या आधी रामदास कदम, एकनाथ शिंदे व आमच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील शहराच्या विकासासाठी अनेक प्रकल्प, रस्त्याची कामे या शहरात केली आहेत. कचऱ्याचा प्रकल्प देखील पूर्ण झाला असून या शहराला कचरामुक्त करण्याचा शिवसेनेने दिलेला शब्द आम्ही पाळला आहे.

विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून यापुढे देखील केवळ संभाजीनगरच नाही तर महाराष्ट्राचा विकास अधिक वेगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करू,असा विश्वास देखील आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.  

येत्या २३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. यानिमित्ताने औरंगाबादचे संभाजीनगर करा,अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली होती. या विषयावर बोलताना ठाकेर म्हणाले, शिवसेनेसाठी व शिवसेना प्रमुख यांच्यासाठी प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा होता. त्यामुळे आम्ही विकासाची कामे करतच राहू असे, सांगत या विषयावर अधिक बोलणे टाळले. 

भाजपाच्या विरोधाला न जुमानता शिवसेना आपले काम जोमाने सुरु ठेवेल. विरोधी पक्ष म्हणून भाजपने त्यांचीं भूमिका बजावावी, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत असा, टोला देखील आदित्य ठाकरे यांनी लगावला.  जगाच्या पाठीवर चांगल्या कामांना विरोध करणारा भाजपसारखा दुसरा कुठलाही पक्ष नसेल, अशी टीकाही ठाकरे यांनी यावेळी केली.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com