क्षीरसागर काका पुतण्यामूळे बीडचा विकास खुंटला 

नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वेळकाढूपणामुळे बीड शहरातील हद्दवाढीत सामविष्ट झालेल्या भागांचा विकास खुंटला आहे.
 Sandeep Kshirsagar, Bharatbhushan Kshirsagar, Vinayak Mete .jpg
Sandeep Kshirsagar, Bharatbhushan Kshirsagar, Vinayak Mete .jpg

बीड : नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वेळकाढूपणामुळे बीड शहरातील हद्दवाढीत सामविष्ट झालेल्या भागांचा विकास खुंटला आहे. आमदार संदीप क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर हे दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून त्यांच्यातील ‘तु - तु - मै - मै’मुळे बीडकर वेठीस धरले जात असल्याचा आरोप आमदार विनायक मेटे यांनी केला. 

शहरातील रेणुका नगरातील सिमेंट रस्ते व नाली बांधाकमाचे भूमिपुजन रविवार (ता. 14) रोजी आमदार मेटे यांच्या हस्ते झाले. यावेळी सुहास पाटील, सुधीर काकडे, रामहरी मेटे, अनिल घुमरे, विनोद कवडे, गणेश धोंडरे, सचिन कालकुटे, दगडू गायकवाड, दत्ता गायकवाड, विजय सुपेकर, राजेंद्र आमटे उपस्थित होते.

मेटे म्हणाले, दोन्ही क्षीरसागरांमध्ये वाद नाही, सर्व काही सत्तेसाठी चालले आहे. सत्ता मिळवायची आणि आपापसांतील वादाचे राजकारण करून नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे, असे सोयीचे राजकारण काका - पुतणे खेळत आहेत. मात्र त्यांचं राजकारण आता बीडकरांच्या चांगले लक्षात आलं आहे. रेणुका नगरमधील रस्ते, नाल्याचा प्रश्न शिवसंग्रामच्या वतीने लवकर मार्गी लावण्यात येईल, असे वचन मी आपणाला दिले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन आगवान व राहुल गायकवाड यांनी केले. गणेश धोंडरे यांनी आभार मानले.

हे ही वाचा...

धनंजय आणि पंकजा मुंडे बीड जिल्हा बॅंकेसाठी दोन हात करणार की बिनविरोधसाठी हात मिळविणार? 
 
बीड : वर्षभरापूर्वी मुदत संपल्यानंतर सुरुवातीला कोरोनामुळे वाढलेली मुदत आणि नंतर मतदार यादी प्रारुप आराखड्यावरुन न्यायालयीन प्रकरणामुळे वर्षभर लांबणीवर पडलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीची अखेर घोषणा झाली. बॅंकेच्या 19 संचालकांच्या निवडीसाठी सोमवारपासून (ता. 15 फेब्रुवारी) उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. ता. 20 मार्चला मतदान, तर दुसऱ्याच दिवशी 21 मार्चला मोतामोजणी होऊन निकाल घोषित होतील. 

आता संचालक निवडीसाठी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे व भाजपच्या राष्ट्रीय सचिव पुन्हा आमने-सामने येणार की, संचालक बिनविरोध निवडीसाठी एकमेकांना हात देणार? हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. बॅंकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी दोन्ही गट सकारात्मक असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

राज्यात 1995 मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले आणि दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले. तेव्हापासून त्यांनी कौशल्याने बॅंकेवर सत्ता प्रस्थापित केली होती. अनेक वेळा त्यांनी विरोधकांनाही आपल्या आघाडीत घेत पदे दिली होती. 

दरम्यान, 1200 कोटींवर ताळेबंद असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत कर्जवाटपात अनियमितता झाल्याने आठ वर्षांपूर्वी बॅंकेचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले. त्याकाळी तत्कालिन संचालक मंडळाने राजीनामे दिल्यानंतर बॅंकेवर दोन वर्षे प्रशासक होते. प्रशासकांच्या काळात अनेक फौजदारी गुन्हेही नोंद झाले. 

दरम्यान, 2015 च्या सुरुवातीला निवडणूक होऊन बॅंकेवर पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीची सत्ता आली. त्याकाळी राष्ट्रवादीत असलेले सुरेश धस व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे दोन्ही नेते याच मुंडेंच्याच आघाडीत होते. काही वर्षे आर्थिक घडी ठप्प असलेल्या बॅंकेला अलिकडच्या काळात दोन पीक कर्जमाफीतून पाचशे कोटींहून अधिक रक्कम भेटली.

तसेच पीक विमा, शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान आदींतून मिळालेले कमिशन, मिळालेल्या रकमांचा योग्य विनियोग केल्याने बॅंकेची आर्थिक परिस्थिती ताळ्यावर आलेली आहे. अगदी नुकतेच जिल्हा बॅंकेने जिल्हा परिषदेच्या थकित ठेवींपैकी 70 कोटी रुपये परत केले आहेत. तर, खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाच्या उद्दीष्टाच्या दुप्पट वाटप केले आहे. सामान्यांच्या ठेवीही मोठ्या प्रमाणावर परत केल्या आहेत. 

दरम्यान, वर्षभरापूर्वीच बॅंकेच्या संचालक मंडळाची मुदत संपली होती. परंतु कोरोना महामारीमुळे बॅंकेची निवडणूक लांबणीवर पडली होती. त्यानंतर बॅंकेच्या मतदार प्रारूप याद्या नव्याने तयार करूनच निवडणूक घेण्यात यावी, यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेचा निकाल लागल्यामुळे सहकार विभागाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. बॅंकेच्या 19 संचालकांच्या निवडीसाठी 20 मार्चला मतदान, तर 21 मार्चला मतमोजणीनंतर निकाल जाहीर होईल. 

दरम्यान, या वेळी निवडणुकीपेक्षा बिनविरोधचे प्रयत्न आणि चर्चा सुरु आहे. सद्यस्थितीत मतदार यादीवर नजर टाकली असता भाजप आघाडीचे पारडे जड वाटते. तर, विरोधात महाविकास आघाडी आहे. त्यामुळे सामंजस्याने ज्या मतदारसंघात (तालुक्‍यात) ज्या नेत्यांची ताकद त्याला तेथील जागा देण्याबाबत प्राथमिक चर्चा आहे. 

याबाबत अद्याप दोन्ही गट चर्चेसाठी आमने-सामने आलेले नाहीत. परंतु, राज्यात सत्ता एकाची आणि बॅंक दुसऱ्याच्या ताब्यात गेली तर अडचण नको; म्हणून अविरोध निवडणूक करून शेतकऱ्यांची आर्थिक वाहिनी पूर्वपदावर आणण्याबाबत एकमत व्हावे, असे जाणकारांचेही मत आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com